महोत्सवी मंडळ गणेशोत्सवामध्ये शास्त्रीय संगीताची मैफील सुरू करून पुणेकरांची अभिजातता घडवीत सांस्कृतिकता जपणारे मंडळ असा निंबाळकर तालीम मंडळाचा लौकिक आहे. शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या मंडळाने यंदाच्या उत्सवामध्ये तिरुपती येथील बालाजी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सांस्कृतिकता जपणारे मंडळ ही ओळख मंडळाकडून सातत्याने जतन केली जात आहे. मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत म्हणजे १९६९ मध्ये भर चौकात बसून उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचे सनईवादन ऐकल्याचे मला आठवते. त्या काळी गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर, दत्ता वाळवेकर यांची भावगीतं या चौकात दाटीवाटीने बसून पुणेकरांनी ऐकली आहेत. गानहिरा हिराबाई बडोदेकर, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, माणिक वर्मा यांचे गायन, राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन अशा कार्यक्रमांमधून निंबाळकर तालीम मंडळाने सांस्कृतिक परंपरा जपलेली होती. सुरेश वाडकर यांनी वयाच्या अकराव्या वर्षी इथे हजेरी लावली आहे, अशी माहिती सांगताना याच परिसरात लहानपणापासून राहिलेले, वावरलेले प्रसिद्ध निवेदक आणि ललित लेखक सुधीर गाडगीळ यांनी मंडळाच्या सांस्कृतिक उपक्रमांचा इतिहास जागविला. निंबाळकर तालीम चौकातच लिमये टाईपरायटिंग हा क्लास होता. त्या क्लासच्या माडीवर गाण्याचे कार्यक्रम होत. एकीकडे चिमण्या गणपती, दुसरीकडे शिवाजी मंदिर, एका बाजूला गाय आळीकडे जाणारा चौक, तर समोर बाजीराव रस्त्याची मर्यादा. मधल्या बेचक्यात निंबाळकर तालीम मंडळ. या चौकामध्ये कोंढाळकर यांचा पानाचा ठेला होता. तिथे बर्फ घेऊन येणाऱ्या गाडीला लटकून बर्फ मिळविण्याचा उद्योग आता साठी पार केलेले त्या वेळचे आम्ही मुले करीत असू, असे गाडगीळ यांनी सांगितले. शिवाजी मंदिराकडून बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गाला त्या काळी गमतीनं या रस्त्याला ‘लोणीविके दामले आळी’ असे संबोधिले जात होते. प्रत्यक्षात दामले यांचा आणि लोण्याचा काहीही संबंध नव्हता. पहाटेच्या वेळी मंडईकडून येणारे मावळ भागातील मावळे दामले यांच्या दाराशी लोणी विकायला बसत. म्हणून या गल्लीला हे गमतीशीर नाव पडले. डोळ्यांनी अंध असलेले,पण आवाजावरून प्रत्येक कार्यकर्त्यांला ओळखून नावाने हाका मारणारे बाळासाहेब अभंग चौकात उभे असत. अखंड कार्यकर्ता म्हणता येईल असे इस्त्रीच्या कपडय़ातील बाळासाहेब जाधव होते. सर्वाशी जमवून घेणारा त्या वेळचा तरुण आणि आता पंचाहत्तरीत असलेल्या सुरेश पवार यांना शताब्दी वर्षांत कार्यकर्त्यांनी अध्यक्षपदाचा मान दिला आहे, अशाही अनेक आठवणी, प्रसंग गाडगीळ यांनी सांगितले. शिवरामपंत दामले, मामासाहेब मोहोळ, बबनराव मानकर या बलोपासकांमुळे निंबाळकर तालमीचे नाव प्रसिद्ध झाले. चौकामध्ये पिठाची गिरणी चालविणारे दादासाहेब कुदळे हे जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळविलेले विद्वान होते. केदार गोखले, अशोक कोंढाळकर, राघवेंद्र मानकर हे युवा कार्यकर्ते आता मंडळाची सांस्कृतिकता जपत आहेत.