जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत देशातील प्रत्येक नागरिकाने केले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शनिवार पेठेतील संजय तांबोळी यांनी ‘कलम ३७० हटविल्यानंतरचा भारत’ असा देखावा साकारला आहे. हा देखावा पाहण्यास नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.

या देखाव्याबाबत लोकसत्ता ऑनलाईनने संजय तांबोळी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, आम्ही प्रत्येकवर्षी चालू घडामोडीवर घरी देखावा तयार करीत असतो. तर यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर या ठिकाणी मागील ७० वर्षापासून असलेले कलम ३७० हटवले आहे. या निर्णयाचे देशातील प्रत्येक नागरिकाने स्वागत केले आहे. हे लक्षात घेता आम्ही कुटुंबीयानी कलम 370 हटविल्यानंतरचा भारत असा देखावा साकारला आहे.

या देखाव्यात जम्मू आणि काश्मीर येथील चौकात लाल ध्वज 370 कलम असताना फडकत होता आणि आता हेच कलम हटविल्यानंतर त्याच चौकात तिरंगा दिमाखात फडकविताना दाखविण्यात आला आहे. तसेच त्या ठिकाणी उंचच उंच इमारती, कंपन्या त्या ठिकाणी कामाला जाणारे नागरिक, जन जीवन पूर्वपदावर आलेले असल्याचा देखावा साकारण्यात आला आहे. हा देखावा पाहण्यास नागरिक सतत येत आहे आणि आमच्या या देखाव्याचे कौतुक करीत आहे. तसेच आता मी हा देखावा साकारला तर आहेच. पण यापुढे जाऊन आपल्या पुण्यात राहणारे जम्मू आणि काश्मीर येथील तरुणाच्या हस्ते आरती लवकरच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, हा देखावा तयार करताना खूप केल्याने आम्हाला एक वेगळा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.