“भाजपामध्ये गेलेल्यांची काम होत नसल्याने, आता ते नेते भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात आहेत. शिवाय, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील काही नेत्यांना परत यायची इच्छा असून, लवकरच त्यांचे स्वागत केले जाईल.” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एकप्रकारे आगामी काळात भाजपाला धक्का बसणार असल्याचे संकेत दिले आहेत.

“भाजपामध्ये सहभागी झालेल्या नेत्यांना असे वाटले होते की, भाजपा सत्तेत येईल तेव्हा त्यांचे ऐकले जाईल. आता त्यांना भाजपला सोडचिठ्ठी द्यायची आहे, कारण त्यांची कामं झाली नाहीत. पुणे व पिंपरी चिंचवडमधील काही नेत्यांना परत यायची इच्छा आहे. त्यांचे लवकरच स्वागत करण्यात येईल.” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

तर, या अगोदर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, “आगामी काळात भाजपामध्ये अनेकांचा प्रवेश होणार आहे. मात्र, काहीजण उगाचच वावड्या उठवत आहेत की, भाजपाचे आमादार आमच्याकडे येणार. अशा वावड्या उठण्याचं एकमेव कारण म्हणजे कुणी त्यांच्याकडे जाणार नाही हे त्यांना देखील माहिती आहे. पण त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये एवढी प्रचंड अस्वस्थता आहे व आमदरांमध्ये एवढी जास्त नाराजी आहे. की हे आमदार काय करतील? अशा प्रकारची भीती मनात असल्यामुळेच त्यांना संकेत देण्यासाठी उगाचच पक्ष प्रवेशाच्या वावड्या उठवल्या जात आहेत.” असं नाशिकमध्ये बोलून दाखवलं होतं.

माझी इच्छा आहे महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवावी – फडणवीस

तसेच, “चिंता करायची गरज नाही भाजपाचे सर्व आमदार एकत्र आहेत. विशेष उल्लेख करून सांगतो की, विविध पक्षांमधून जे भाजपात आलेले आहेत, ते राजकीयदृष्ट्या अधिक प्रगल्भ आहेत. त्यांनी मोठं राजकारण बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांना हे समजतं आहे.” असं देखील फडणवीस त्यावेळी म्हणाले होते.

त्यामुळे आता नेमकं कोण कुठं जाणार व कोणत्या पक्षाला आगामी काळात धक्का बसणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या दोन्ही दिग्गज नेत्यांनी केलेल्या सूचक विधानांमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.