आठवीपर्यंत पुढच्या वर्गात आलेली मुले नववीच्या वर्गात मोठय़ा प्रमाणावर अनुत्तीर्ण होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या वर्षी राज्यातील अडीच लाख मुले नववीला नापास झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे. आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे की अनुत्तीर्ण याबाबत सध्या देशात वादविवाद सुरू आहेत. राज्यात मात्र आठवीपर्यंत पुढच्या वर्गात ढकललेले विद्यार्थी नववीला गेल्यावर अनुत्तीर्ण होत असल्याचे समोर आले आहे. शासकीय आकडेवारीनुसार गेल्या वर्षी जवळपास अडीच लाख मुले नववीला अनुत्तीर्ण झाली होती. राज्यातील शाळा, विद्यार्थी संख्या, शिक्षक यांची यूडाएस या प्रणालीकडून गोळा करण्यात आलेली आकडेवारी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यानुसार नापासांचे हे प्रमाण पुन्हा एकदा समोर येत आहे. यूडाएसच्या आकडेवारीनुसार शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मध्ये १९ लाख ७० हजार ५१४ विद्यार्थी नववीच्या वर्गात होते. मात्र त्यातील १७ लाख २७ हजार ५५९ विद्यार्थीच गेल्या वर्षी म्हणजे २०१५-१६ या वर्षांत दहावीच्या वर्गात प्रवेश घेऊ शकले. त्यानुसार २ लाख ४२ हजार ९५५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे नववीच्या वर्गात नापास करण्यात येत नसल्याचे शाळांच्या दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.