राज्यात झालेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मला ज्या उमेदवाराने पाडले त्या उमेदवाराचाच आता लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्याची वेळ आली आहे. हे आता जिवावर आले आहे. मात्र, मी आघाडीचा धर्म पाळणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे काहीही झाले तरी आघाडीचा उमेदवार नगरमधून प्रचंड मतांनी निवडून आणणार आहे, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करीत काँग्रेसचे प्रदेश युवक अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पुण्यात कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.

पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युवक पदाधिकाऱ्यांचा मेळावा गुरुवारी पार पडला. यावेळी केशवचंद यादव, धीरज शर्मा, प्रवीण गायकवाड, चित्रलेखा पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नगरमधील आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्याबाबत तांबे बोलत होते.

यावेळी तांबे म्हणाले, देशभरात निवडणुकीच्या तयारीला सुरवात झाली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील नगरच्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या नगरमध्ये आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणावर असल्याने यंदाच्या निवडणुकीत आघाडीचे उमदेवार निवडून जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्ताधारी पक्षाने गेल्या पाच वर्षात जे चुकीचे निर्णय घेतले आहेत. ते जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या अखेरच्या दिवसापर्यंत करावे, असे आवाहनही यावेळी सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांना केले.