संगणक अभियंता युवतीच्या खुनाचे गूढ कायम

तळवडे भागातील माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला असलेल्या अंतरा दास या संगणक अभियंता युवतीचा दोन वर्षांपूर्वी तळवडे भागात खून झाला. अंतराच्या खूनप्रकरणाचा तपासात बंगळुरूतील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत असलेल्या  संगणक अभियंता संतोष कुमार याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. अंतराच्या खूनप्रकरणात त्याचा हात असल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आली. मात्र, त्याच्याविरूद्ध पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.अंतराच्या खून प्रकरणात संतोषकुमारला केवळ संशयावरून अटक करण्यात आली होती. त्याच्याविरूद्ध  पुरावे गोळा करण्यात अपयश आल्याने पोलिसांनी नुकताच अंतराच्या खून प्रकरणातून संतोषकुमारला वगळावे, असा अर्ज शिवाजीनगर न्यायालयात सादर केला. न्यायालयाने संतोषकुमारला खून प्रकरणातून वगळण्याचे आदेश दिल्यानंतर  ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने आता  पुन्हा अंतराच्या मारेकऱ्याचा माग काढण्यास सुरूवात केली आहे. अंतराच्या खुनाचे गूढ गेले पावणेदोन वर्ष कायम आहे.

अंतरा मूळची कोलकात्यातील. बंगळुरुतील आयटी कंपनीत काम करत असलेल्या अंतराला दोन वर्षांपूर्वी तळवडे आयटी पार्कमधील माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरी मिळाली. बंगळुरूतील नोकरी सोडण्यामागे सहकारी संतोष कुमार याचा त्रासदेखील कारणीभूत होता. संतोष तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्यामुळे तिने बंगळुरु सोडण्याचा निर्णय घेतला होता. पिंपरी-चिंचवड शहरालगत असलेल्या तळवडे आयटी पार्कमध्ये नोकरी मिळाल्यानंतर अंतराने पिंपरी शहर परिसरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तेथील एको सदनिकेत ती पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. तळवडे आयटी पार्कचा भाग हा हिंजवडी आयटी पार्कएवढा गजबजलेला नाही.  २३ डिसेंबर २०१६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ती कंपनीतून घरी निघाली होती. तळवडे आयटी पार्कमधील मुख्य चौकातून रिक्षाने ती घरी जाणार होती. काही अंतरावर दबा धरून बसलेल्या मारेकऱ्याने अंधारात चाकूने अंतरावर हल्ला चढवला. चाकूने तिला भोसकले. चाकूने भोसकल्यामुळे अंतराच्या शरीरातून मोठय़ा प्रमाणावर रक्तस्त्राव सुरु झाला आणि ती कोसळली.

अंधारात मारेकरी पसार झाला. काही वेळाने तेथून निघालेल्या एका दुचाकीस्वाराने तरुणी पडल्याचे पाहिले. त्यामुळे त्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली. दुचाकीचा प्रकाशझोत अंधाऱ्या जागेच्या दिशेने नेला. तेव्हा तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याने पाहिले. क्षणभर काय करावे, हे दुचाकीस्वाराला सुचले नाही. त्याने प्रसंगावधान राखून या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि तरुणीला पिंपरीतील रुग्णालयात दाखल केले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राम जाधव आणि पथकाने तातडीने तपास सुरू केला. रुग्णालयात अंतराच्या बॅगेत सापडलेल्या ओळखपत्रावरुन ती संगणक अभियंता असल्याचे उघडकीस आले. संगणक अभियंता तरुणीचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरु केला. तिच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. संगणक अभियंता तरुणीच्या खुनाचा  छडा लावण्यासाठी पोलिसांकडून पथके तयार करण्यात आली.

खुनामागचा उद्देशदेखील पोलिसांना कळला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अंतराच्या कंपनीतील सहकाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली. तिच्या कुटुंबीय आणि निकटवर्तीयांकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा, अंतरा वर्षभरापूर्वी बंगळुरुतील माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला असल्याचे समजले. पोलिसांचे एक पथक तातडीने बंगळुरुला रवाना करण्यात आले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार संतोष कुमार हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयावरुन त्याला ताब्यात घेतले. संशयावरुन त्याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी केलेल्या तपासात ज्या दिवशी अंतराचा खून झाला, त्यादिवशी संतोष कुमार बंगळुरुतील कंपनीत काम करत होता. त्याच्या मोबाइलची तांत्रिक पडताळणी करण्यात आली, तेव्हा तो बंगळुरुत असल्याचे तांत्रिक तपासात उघड झाले. दरम्यान, संतोष कुमार याच्याविरुद्ध ठोस पुरावे सादर करणे तसेच त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यास पोलिसांना अपयश आले.

खून झाल्यानंतर नव्वद दिवसांच्या कालावधीत दोषारोपपत्र सादर न केल्याने संतोष कुमारला शिवाजीनगर न्यायालयाकडून गेल्या वर्षी जामीन मंजूर करण्यात आला. याबाबत पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे म्हणाले,की याप्रकरणातील संशयिताविरूद्ध तांत्रिक तसेच परिस्थितीजन्य पुरावे न मिळाल्याने पोलिसांनी न्यायालयात त्याला अंतराच्या खूनप्रकरणातून वगळण्याचा अर्ज न्यायालयात नुकताच दिला. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला.

सुरूवातीला पोलिसांकडून चोरटय़ांची चौकशी करण्यात आली. तळवडे भागातील रिक्षाचालक, पानपट्टीचालक, किरकोळ विक्रेत्यांकडे करण्यात आलेल्या चौकशीतून फारसे काही निष्पन्न होऊ शकले नाही, तसेच तांत्रिक तपासातून उपयुक्त माहिती मिळाली नाही. अंतराच्या मारेक ऱ्याची माहिती देणाऱ्यास ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी पंचवीस हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

मात्र, अंतराच्या खूनप्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. संशयिताला खून प्रक रणातून वगळण्यात आल्यानंतर पोलिसांनी पुन्हा मारेकऱ्याचा माग काढण्यास सुरूवात केली आहे. अंतराच्या खुनाचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांकडून तपास करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक गावडे यांनी सांगितले.

राहुल खळदकर rahul.khaladkar@expressindia.com