पुणे : शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांना फटका बसला आहे. कांदा, आंबा, काजू, केळी, भुईमूग, बाजरी, भाजीपाला पावसामुळे वाहून गेला असून, काढणीला आलेला कांदा आणि बाजरीलाही फटका बसला आहे.
मे महिन्यात जिल्ह्यात सुमारे अडीच हजार हेक्टरवरील शेतीपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल प्रशासनाकडून देण्यात आला होता. कृषी आणि महसूल प्रशासनाच्या माहितीनुसार, २०२५ मध्ये पावसामुळे ५९७ गावांतील ७१४६ शेतकऱ्यांचे सुमारे २४१८.५४ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे.
जिरायत २५१.०८ हेक्टर, बागायत १८८४.७२ हेक्टर, तर फळपिकांचे सुमारे २०८२.७४ क्षेत्रांवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने पेरणीपूर्व कामे खोळंबली आहेत. मान्सूनच्या आधी शेताची नांगरणी, उखरणी, कोळपणी, शेणखत टाकणे, बांध, अशी कामे रखडल्याने वापसा होईपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीसाठी थांबावे लागले आहे.