बारामती : बारामतीच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उपमुख्यमंत्री अजित पवार उतरले आहेत. पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांंच्या पॅनेलविरोधात कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचेही पॅनेल निवडणूक लढविणार असल्याने पवार यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. अजित पवार उमेदवारी अर्ज कायम ठेवणार की माघार घेणार, यावर या निवडणुकीची रंगत अवलंबून आहे.
माळेगाव कारखान्याची निवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जात आहे. माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या पॅनेलचे मोठे आव्हान आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षही ताकद दाखविणार आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. इंदापूरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष तटस्थ भूमिकेत होता. मात्र, या कारखान्याच्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रतिनिधीमार्फत अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर मेळावा घेत या कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे जाहीर केले होते. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी दोन वेळा या कारखान्यावर वर्चस्व सिद्ध केले आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने माघार घेतली होती. मात्र, या कारखान्याच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. तसेच, कष्टकरी शेतकरी समितीचेही पॅनेल केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या कारखान्याच्या निमित्ताने बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
अर्ज माघारीकडे लक्ष
या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या ५९३ उमेदवारी अर्जांची २८ मे रोजी छाननी होणार आहे. २९ मे ते १२ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. या कालावधीत उपमुख्यमंत्री पवार उमेदवारी अर्ज मागे घेणार का, याकडे लक्ष असणार आहे. १३ जून रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीसाठी कोणाला संधी मिळणार आणि किती पॅनेल असणार, हे स्पष्ट होणार आहे.