पुणे : एकीकडे राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविला जात असताना, दुसरीकडे महाबळेश्वरवगळता राज्यात पारा सरासरी ३० अंश सेल्सिअसवर गेला आहे. ऐन पावसाळय़ात उकाडय़ामुळे लोक हैराण आहेत. दुसरीकडे, उन्हाच्या झळा वाढल्यामुळे पिके करपू लागली आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी अकोल्यात सर्वाधिक ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती, वध्र्यात ३५.५ तर यवतमाळमध्ये ३४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईत पारा ३० अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे. हवामान विभाग मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज सतत वर्तवीत आहे आणि दुसरीकडे पाऊस हुलकावणी देताना दिसत आहे.

हेही वाचा >>>सामूहिक रजा आंदोलनात ६५ हजार शिक्षकांचा सहभाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोसमी पाऊस आजपासून सक्रिय?

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज, बुधवारपासून राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ात बुधवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे. गुरुवार आणि शुक्रवारी पावसाचा विशेष जोर राहण्याचा अंदाज हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी वर्तवला.