महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी 'अभिनंदन' मुलाखत घेतली. याशिवाय सरकारमधील विविध मंत्र्यांनी आपापल्या कामगिरीबाबत प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या. कर्जत जामखेड मतदारसंघातून राम शिंदे यांना पराभूत करून रोहित पवार विजयी झाले. ठाकरे सरकार आणि रोहित पवार यांनी वर्षभरात कशी कामगिरी केली याबद्दल राम शिंदे यांनी रोखठोक मत व्यक्त केलं. रोहित पवार यांच्या वर्षभराच्या कामगिरीबाबत तुम्ही त्यांना किती गुण द्याल? असा सवाल पत्रकारांनी राम शिंदे यांना विचारला. "मी त्यांच्या विरोधात विधासभा निवडणूक लढलो होतो. त्यांनी मला पराभूत करून येथून विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांना गुण किती द्यायचे हे आता मी ठरवणार नाही. येथील जनताच आता त्याचा निर्णय घेईल", असे राम शिंदे म्हणाले. मतदार संघातील विकासकामे आणि एकंदर ठाकरे सरकारची कार्यशैली यावरूनही राम शिंदे यांनी सरकारवर टीका केली. आणखी वाचा- “राज्यातली विकासकामं सोडून ट्रम्प, बायडेन काय करतात याकडेच लक्ष” "मतदार संघातील किंवा राज्यातील जनतेला जी आश्वासने दिली होती, ती आश्वासने पूर्ण करण्यात आली नाहीत. वर्षभरात भरपूर विकास करून दाखवतं सांगण्यात आलं होतं. विविध आमिषं दाखवण्यात आली होती. पण वर्षभराच्या कालखंडात कोणत्याही प्रकारच्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेली नाही. सध्या डोनाल्ड ट्रंप काय करतात? बायडन काय करतायत? बिहारच्या निवडणुकीमध्ये काय चाललं आहे? याकडेच ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांचं लक्ष आहे. अशा परिस्थितीत स्वत:च्या मतदारसंघात विकासाची कामं करायचं राहून जातंय", असा खोचक टोला त्यांनी रोहित पवार आणि इतर मंत्र्यांना लगावला.