पुणे : ‘महिलांवर अत्याचार करणाऱ्यांबाबत कडकच भूमिका घेतली जाईल,’ असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. मात्र त्याच वेळी प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावरील आरोपांबाबत राजकारण केले जात असल्याचा आरोप करून, बृजभूषणसिंह यांच्या मुलाला दिलेल्या उमेदवारीचे त्यांनी समर्थन केले.

सीतारामन यांनी शनिवारी पुण्यातील संपादकांशी संवाद साधला. कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर महिलांवर अत्याचार केल्याच्या तक्रारी आहेत, तर महिला कुस्तीगिरांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले भाजप नेते बृजभूषणसिंह यांच्या मुलाला पक्षाने उत्तर प्रदेशातून उमेदवारी दिली आहे. या दोन्हीबाबत भाजपची भूमिका काय, असे विचारले असता, सीतारामन यांनी महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबत कोणतीही दयामाया न दाखविण्याचीच भाजपची भूमिका असल्याचे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनीही हे स्पष्ट केले असल्याचे सांगितले. 

हेही वाचा >>> निर्मला सीतारामन यांना विद्यार्थिनीने विचारला प्रश्न… ‘तुम्ही कणखर कशा?’

रेवण्णा यांच्या उमेदवारीबाबत त्या म्हणाल्या, ‘‘ज्या पेन ड्राइव्हमधील चित्रीकरणावरून रेवण्णा यांच्यावर आरोप झाले, तो पेन ड्राइव्ह सुमारे वर्षभरापासून कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडे होता, काही मंत्र्यांना ते माहीतही होते. त्यांनी त्या वेळी त्यावर काहीच कारवाई का नाही केली? लोकसभा निवडणुकीत वोक्कलिगा समाजाची मते आपल्यापासून दूर जाऊ नयेत, म्हणून काँग्रेसने निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडू दिल्यानंतर याची वाच्यता केली आणि आता तेथील मुख्यमंत्री पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना याबाबत पत्रे लिहीत आहेत. काँग्रेसचे हे वागणे शुद्ध दांभिकपणाचे आहे.’’ 

बृजभूषणसिंहांच्या मुलाला मिळालेल्या उमेदवारीबाबत त्या म्हणाल्या, ‘बाबा, काका, मामा, काकू आदी नातेवाईक तुरुंगात असलेले अनेक उमेदवार इतर पक्षांत आहेत. बृजभूषणसिंहांच्याबाबत तर नुसते आरोप आहेत, सिद्ध काहीच झालेले नाही.’

‘काँग्रेसचा जाहीरनामा देशासाठी अहितकारक’

 प्रचारामध्ये भाजप गेल्या १० वर्षांतील कामाबद्दल बोलत नसल्याचा आरोपही त्यांनी खोडून काढला. ‘निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडण्यापूर्वीच आमच्या सर्व कामांची माहिती आम्ही विकसित भारत यात्रेद्वारे अगदी पंचायत स्तरापर्यंत पोचवली. त्यानंतर निवडणुकीसाठी आम्ही प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात एकही खोट काढणे काँग्रेसला जमलेले नाही. उलट काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्यात देशासाठी अहितकारक अशा अनेक गोष्टी आहेत. संपत्तीच्या फेरवितरणाच्या मुद्दयाबाबत ज्या शंका आहेत, त्यावर आम्ही प्रश्न विचारतो आहोत. अलीगड मुस्लीम विद्यापीठ आणि ‘जामिया मिलिया इस्लामिया’ या राष्ट्रीय शिक्षण संस्था असूनही तेथे अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षण नाही. तेथे विशिष्ट अल्पसंख्याकांनाच सुविधा आहेत. असे असेल, तर त्या विरोधात आम्ही बोलायचे नाही का,’ असा सवाल उपस्थित करून, सीतारामन यांनी, ‘भाजप काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत बोलल्याने बचावात्मक झाला नसून, उलट आक्रमक झाला आहे,’ असा दावा केला. 

‘जीएसटी दरांच्या सुसूत्रीकरणाबाबतचा मंत्रिगटाचा अहवाल लवकरच’

इतके दिवस ‘जीएसटी’ला गब्बरसिंग टॅक्स म्हणणारे राहुल गांधी किमान आता ‘जीएसटी’बाबत बोलत तरी आहेत, असा टोला हाणून निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘जीएसटीच्या दरांचे सुसूत्रीकरण करण्यासंदर्भात मंत्रिगट नेमण्यात आला आहे. त्याच्या अहवालानुसार जीएसटी परिषदेत त्याबाबत निर्णय घेतला जाईल.’ ‘निवडणूक रोखे हा घोटाळा आहे, असे म्हणणाऱ्या पक्षांनीही यातून मिळालेले पैसे घेतले आहेत. कोणतेही आरोप करताना, हे विधेयक संसदेत मंजूर झाले होते, हे त्यांनी लक्षात ठेवावे,’ असेही त्या म्हणाल्या.