“एखाद्या माणसाला आपल्या पायाखालची वाळू घसरली की, आपण आजपर्यंत जे केलं ते उघड पडलेलं आहे आणि कारवाई होईल. तसेच आपल्यावरच नाही तर आपल्या कुटुंबातील लोकांवर देखील होईल. अशी भीती वाटल्यानंतर माणूस सैरभैर होतो. अशीच स्थिती आत्ता संजय राऊत यांची झाली आहे. त्यामुळे ते रोज उठून महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवणारी विधान करत आहेत आणि शिवराळ भाषा वापरत आहेत,” अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावर दिली आहे. “मी मागील दोन दिवसापासुन उद्धवजीना विनंती करीत आहे की, त्यांना जरा आवरा, संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतल्यासारखं दिसतंय. त्यामुळे शिवसेनेची प्रतिमा बिघडत आहे, त्यामुळे तुम्ही संजय राऊतांना आवरा अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंनी केली. तसेच मला मागील २७ महिन्यांमध्ये शिवसेनेचे एकही प्रवक्ते बोलताना दिसत नाहीत. अनिल देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणीच बोलत नाही. एकमेव प्रवक्ते त्यांना एकच काम मोदींना शिव्या, केंद्राला शिव्या, राज्यपालांना शिव्या यातून शिवसेनेची प्रतिमा बिघडत आहे,” असं त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. संजय राऊतांनी शिवी दिल्यासंबंधी विचारलं असता सोमय्या म्हणाले; “माझ्या आईला संताप नको, एकदाच काय ते…” शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांना शिवी दिली होती. त्याचा संदर्भ देत चंद्रकांत पाटील म्हणाले की, “हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा कडक शब्दात बोलायचे, पण ते शिवीगाळ करत नव्हते. परवा संजय राऊतांनी किरीट सोमय्यांसाठी एक शिवी वापरली.” असे म्हणताच तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी आज राऊतांनी *** शब्द वापरला आहे, अशी आठवण चंद्रकांत पाटील यांना करून दिली. “देशात असे *** फार आहेत,” उद्धव ठाकरेंनी सोनियांची परवानगी घेतलीये का? विचारणाऱ्या सोमय्यांवर राऊत संतापले यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “संजय राऊत *** हा शब्द अनेक वेळा वापरतात. त्यामुळे मला एक वाटत की जोपर्यंत उद्धवजींना राज्य चालवयाचं आहे, जोपर्यंत त्यांच्याकडे राज्य आहे. तोपर्यंत त्यांनी राज्य चालविताना बिघडत चाललेल्या या संस्कृतीचा विचार केला पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. तर, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, “२०१९ ला असेच सर्व पक्ष एकत्र आले होते. मतमोजणीच्या वेळी सर्वजण नवेकोरे कोट घालून दिल्लीत आले होते. परंतु त्यांचं मग काय झालं, ते देशाने पाहिलं आहे. आता २०२४ मध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपाला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.