पिंपरी : ‘प्राथमिक आरोग्यावर भर दिल्यास विशेषोपचार असलेल्या सेवांवरील ताण कमी होतो. त्यामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने राज्यातील आरोग्य सेवेची पुनर्रचना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे सांगितले. आरोग्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
मावळ तालुक्यातील आंबी- तरंगवाडी येथे पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलपती संजय पाटील, उपकुलपती डॉ. शिवानी पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे या वेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत करण्यात येतात. आरोग्य सेवेच्या क्षेत्रात विमा आणि सेवेची खात्री, या माध्यमातून गरिबांतील गरीब रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. राज्यात प्राथमिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासह द्वितीय स्तरीय आरोग्य सेवाही बळकट करण्यात येणार आहेत. आरोग्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न आहे.’
‘राज्य शासनाने केंद्र शासनाच्या मदतीने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात दहा वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे,’ असे नमूद करून फडणवीस यांनी, ‘महाराष्ट्रात शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी क्रांती आणण्याचे आणि तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी मिळवून देण्याचे काम करणाऱ्यांमध्ये डॉ. डी. वाय. पाटील हे एक अग्रणी नाव आहे,’ असेही सांगितले.
‘कामगारांना कमी खर्चात उपचार’
‘औद्योगिक वसाहत आणि परिसरातील सामान्य माणसाला कमी खर्चात चांगले उपचार देण्यासाठी पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाचा फायदा होणार आहे. येथे अत्यंत आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या परिसराला वरदान ठरेल असे रुग्णालय उभे करण्यात आले आहे,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.