पिंपरी : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांतून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून निगडी, चिखली, भोसरी, नेहरूनगर, पिंपळे निलख, आकुर्डी या भागांत गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा हाेत असून, पाण्याची चव बदलल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मात्र, पाणी पिण्यायाेग्यच असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. पावसाळ्यातील चार महिने धरणातील पाणी न वापरता नदीतील पाण्याचा वापर केला जाताे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. पावसाळ्याच्या सुरुवातीला नदीच्या पाण्यात गाळ, झाडपाला, सांडपाण्यासह इतर कचरा वाहून येताे. त्यामुळे पाणी काही प्रमाणात गढूळ होऊन त्याचा ‘टीडीएस’ वाढताे. त्याचा परिणाम पाण्याची चव व वासावर होतो. सध्याही यामुळे गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत.
दरम्यान, जलवाहिनी आणि टाक्या स्वच्छ केल्या जातात. ज्या भागात गढूळ पाण्याच्या तक्रारी आहेत, तेथे तातडीने जलवाहिनी स्वच्छ केली जात असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
असे होते शुद्धीकरण
महापालिका रावेत बंधाऱ्यावरून पाणी उचलते. ते पाणी निगडी प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तसेच आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीवरील निघाेजे बंधाऱ्यावरून उचलून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. या पाण्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मानकांप्रमाणे शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. शुद्ध केलेले पाणी शहरातील विविध जलकुंभांमध्ये सोडले जाते. त्यातून जलवाहिनीद्वारे नागरिकांना पाणी वितरित केले जाते.
पाणी उकळून पिण्याचे आवाहन
पावसाळ्याच्या सुरुवातीला पाणी काही प्रमाणात गढूळ असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून वापरावे. ज्या भागात गढूळ पाण्याची तक्रार येत आहे, अशा भागांत विशेष लक्ष दिले जात आहे. पाण्यावर सर्व प्रक्रिया करूनच नागरिकांना त्याचे वितरण केले जाते. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण शहरात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. यामुळे विविध आजार हाेण्याची नागरिकांना भीती आहे. प्रशासनाने उपाययोजना करून सुरळीत पाणीपुरवठा करावा.– उषा मुंडे,माजी नगरसेविका
स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाण्यावर ‘डब्ल्यूएचओ’च्या मानकांप्रमाणे शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जात आहे. ज्या भागात गढूळ पाणी येत आहे, तेथील नागरिकांनी स्थानिक पाणीपुरवठा कार्यालय, नियंत्रण कक्षात तक्रार नोंदवावी. तत्काळ उपाययाेजना केली जाईल.-अजय सूर्यवंशी, सह शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका