पुणे : ‘विवेकावर आधारित चर्चा होण्यापेक्षा पूर्वग्रहदूषित मतांवर होत असल्याने धर्मनिरपेक्षता ही संकल्पना भारतीय समाजाने गुंतागुंतीची केली आहे,’ असे मत राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. प्रकाश पवार यांनी शनिवारी व्यक्त केले. ‘गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटना आणि समतेचे जीवन हा वाहता प्रवाह ध्यानात घेऊन ‘सेक्युलर मूव्हमेंट महाराष्ट्र’ चळवळीने धर्मनिरपेक्ष संकल्पना अधोरेखित केली,’ असा गौरवही त्यांनी केला.

‘सेक्युलर मूव्हमेंट महाराष्ट्र’ चळवळीच्या प्रतिनिधी अधिवेशनाचे उद्घाटन प्रा. प्रकाश पवार यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. चळवळीचे प्रमुख प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्या ‘फुले-आंबेडकरी समकालीन राजकारण’ आणि ‘क्रांतिबा फुले’ या पुस्तकांचे प्रकाशन भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरोदे, उद्योजक सी. आर. सांगलीकर, ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे, श्रीकांत देशमुख, भरत शेळके, एम. आर. कांबळे आदी या वेळी उपस्थित होते.

प्रा. पवार म्हणाले, ‘धर्मनिरेपक्षता हे जागतिक पातळीवरचे काम असून, अमेरिकेतही ही चळवळ रुजत आहे. मानवतावाद हीच धर्मनिरपेक्षतेची पूर्वअट आहे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करून उदारमतवादी करण्यासाठी प्रवृत्त करण्याबरोबरच माणसाच्या आजच्या समस्या सोडवण्यासाठी ‘सेक्युलर मूव्हमेंट’ कार्यरत आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘धर्मनिरपेक्षता ही उद्याच्या जगाची अपरिहार्य गरज आहे. चळवळीच्या तलवारी आम्ही म्यान केल्या नाहीत, याचा आनंद आहे. जातिव्यवस्थेतून निर्माण झालेली अस्पृश्यता आजही सुरू आहे. ज्याने त्याने आपल्या सोयीनुसार धर्मनिरपेक्षतेची व्याख्या केली असून, आपण धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा सारे राजकीय पक्ष करतात. धार्मिक स्थळांना कोट्यवधी रुपये देऊन सरकार धार्मिकता वाढविण्याचे काम करत असल्याने अस्वस्थ आहे. भारताचे हिंदूराष्ट्र करणे ही स्वतःची कबर खोदण्यासारखे आहे. दुर्दैवाने शतकानुशतके गुलामीत असलेले हिंदूच या पालखीचे भोई होत आहेत. सत्तेवर असलेले अल्पमतात आहेत. बहुमतात असलेल्या लोकांमध्ये गोंधळ असल्याने हा पेच आहे,’ असे गौतमीपुत्र कांबळे यांनी सांगितले. भरत नाईक यांनी प्रास्ताविक केले. प्रभाकर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.