पुणे : राज्यातील मराठी तसेच उर्दू माध्यमाच्या पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठीचा द्विभाषिक एकात्मिक पाठय़पुस्तकांबाबतचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आता ‘निपुण भारत अभियाना’तील अध्ययन निष्पत्तीच्या आधारे नवा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दांची ओळख व्हावी, विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी व्हावे या उद्देशाने एकात्मिक द्विभाषिक पुस्तके देण्याचा निर्णय गेल्या वर्षी तत्कालिन शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी घेतला होता. त्यानुसार पाठय़पुस्तक मंडळाने पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिलीची पुस्तके सर्व शासकीय शाळांमध्ये, तर दुसरीची पुस्तके ४८८ आदर्श शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर दिली. यावेळी काही बाबी शासनाच्या निदर्शनास आल्या. निपुण भारत अभियानामध्ये निश्चित केलेला नवा अध्ययन स्तर पूर्वप्राथमिक ते तिसरीपर्यंत करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आधीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. कारणे काय? द्विभाषिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषा शिकण्यात अडचणी येतात, त्यांचे शिक्षण नीट होत नाही. तसेच एकात्मिक द्विभाषिक पुस्तके एका सूत्राभोवती गुंफलेली असल्याने मराठी, इंग्रजी आणि गणित विषयांची तर्कसंगत मांडणी करताना, व्याकरण शिकवताना शिक्षकांना अडचणी येत असल्याचे आढळले. शिवाय, एकात्मिक द्विभाषिक पुस्तके निपुण भारत अभियानात नमूद अध्ययन निष्पती स्तरापेक्षा कमी दर्जाची आणि जुन्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत.