पुणे : ‘यापुढे आपत्कालीन विभागात (इमर्जन्सी) कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नाही,’ असा निर्णय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने शनिवारी घेतला. त्याची लगेच अंमलबजावणी करण्यात आली असल्याची माहितीही रुग्णालयाने दिली.

ईश्वरी (तनिषा) भिसे यांना पैशांअभावी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तातडीने उपचार देण्याची टाळाटाळ केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. राजकीय पक्ष, संघटनांनी शुक्रवारी आणि शनिवारीही याप्रकरणी रुग्णालयाविरोधात आंदोलने केली, तसेच कारवाईची मागणीही केली. त्या पार्श्वभूमीवर, रुग्णालयाचे विश्वस्त आणि व्यवस्थापनाची बैठक होऊन त्यामध्ये हा निर्णय झाल्याची माहिती वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी दिली.

‘जेव्हा ‘दीनानाथ’ सुरू झाले, तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) घेतली जात नसे; परंतु जसजसे उपचार, शस्त्रक्रिया व रुग्णालयाचे नाव वाढत गेल्यामुळे गुंतागुंतीचे रुग्ण येणे वाढत गेले, तसतसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास अनामत रक्कम घेण्यास सुरुवात झाली.

कालच्या (शुक्रवारच्या) उद्विग्न करणाऱ्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला व यापुढे दीनानाथ रुग्णालय ‘इमर्जन्सी’मधील कुठल्याही रुग्णाकडून, मग तो इमर्जन्सी रूममध्ये आलेला असो, वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलो असो, वा लहान मुलांच्या विभागात आलेला असो; त्यांच्याकडून ‘इमर्जन्सी’मध्ये अनामत रक्कम घेणार नाही, असा ठराव विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी केला,’ असे याबाबत रुग्णालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

‘भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रेरणेने व आदर्शवादाच्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू झाले. हे रुग्णालय इतरांपेक्षा वेगळे आहे, कारण यामध्ये सचोटी, कमिशन पद्धतीला अजिबात थारा न देणे, फार्मा इंडस्ट्रीकडून कोणतेही पैसे व प्रायोजकत्व न घेणे, रुग्णाशी नियंत्रित दरामध्ये व शिस्तीमध्येच सर्व व्यवहार करणे, जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे, पारदर्शकता व आलेल्या सर्व गरीब व गरजू रुग्णांची मदत करणे, ही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करण्यात आली.

आजमितीला ८५,००० आंतररुग्ण दर वर्षी, पाच लाख बाह्य रुग्ण आणि ३० हजार मोठ्या शस्त्रक्रिया रुग्णालय रुग्णांच्या विश्वासावरच करीत आहे. यामध्ये गरीब रुग्णांना रोज दहा रुपयांमध्ये कुठल्याही विभागाचा केस पेपर, रोज ५० टक्के सवलतीत सर्व तपासण्या व दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया या केल्या जातात आणि त्याची दर महिन्याला धर्मादाय आयुक्त कार्यालयाला पूर्ण यादी पुरवली जाते,’ असेही पत्रात नमूद केले आहे.

‘संवेदनशीलता दाखवली, की नाही, हे तपासतो आहोत’

स्वाइन फ्लू, कोव्हिड, जीबीएस आदी साथींच्या वेळी रुग्णालयाने केलेल्या कामगिरीचा उल्लेख करून शुक्रवारी झालेल्या आंदोलनांबाबत पत्रात खंत व्यक्त करण्यात आली असून, पुढे म्हटले आहे, ‘‘हेचि काय फळ मम तपाला,’ इथपासून ते या समाजात चांगले काम करूच नये अशा प्रकारचे सर्व विचार व सल्ले मिळू लागले.

या सर्व गोष्टींनी उद्विग्न होऊन विश्वस्त मंडळाची बैठक झाली व त्यात या विषयावर सखोल चर्चा झाली. लोक कशा पद्धतीने चुकीचे वागत आहेत किंवा या विषयाला राजकीय रंग कसा येत चालला आहे, हे सोडून देऊन, आपले काय चुकत आहे यावर आत्मचिंतन करण्यात आले. हा सर्व विचार करीत असताना एक शब्द आमच्या सर्वांच्या मनात काळोख्या रात्रीतल्या विजेसारखा चमकून गेला – ‘असंवेदनशीलता’.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्थात, व्यवहाराच्या चौकटीमध्ये आदर्शवादाचा किंवा संवेदनशीलतेचा कोंडमारा झालेल्या दुर्दैवी घटनेमागे व मृत्यूमागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे चुकीचे चालले असले, तरी रुग्णालयाकडून रुग्णाप्रति संवेदनशीलता दाखवली गेली, की नाही, हे आम्ही तपासत आहोत. संबंधित महिलेच्या नातेवाइकांना मी स्वत: त्यांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा, बाकी सर्व मदत आम्ही करू, असे सांगितलेले असतानाही कोणालाही न कळवता ते निघून गेले.’