लोकसत्ता खास प्रतिनिधी पुणे: पावसाळा सुरू होताच साथरोगांचा प्रसार वाढू लागला आहे. पुण्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जून महिन्यात डेंग्यूचे ५४ संशयित रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्येचा आकडा फारसा मोठा नसला तरी मे महिन्याच्या तुलनेत त्यात दुप्पट वाढ झाली आहे. याबाबत महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार म्हणाले की, महापालिका हद्दीत यंदा जानेवारी ते जून या कालावधीत डेंग्यूचे ४७२ संशयित रुग्ण आढळले. याच कालावधीत डेंग्यूचे २१ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे सर्व रुग्ण जानेवारी ते मार्च या कालावधीत सापडले असून, एप्रिल ते जून या कालावधीत एकही रुग्ण सापडलेला नाही. मे महिन्यात डेंग्यूचे २७ संशयित रुग्ण होते. जून महिन्यात त्यांची संख्या ५४ वर पोहोचली आहे. ही संख्या फारशी मोठी नसल्याने चिंता करण्याचे कारण नाही. आमच्याकडून डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. आणखी वाचा-मधाची ‘गोड’ बातमी…महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने घेतला ‘हा’ निर्णय पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साचतात. अशा डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पावसाळ्यात डासांमुळे होणारे रोगांचे प्रमाण वाढते. त्यामुळे घरांच्या भोवताली डबकी साचणार नाहीत याची काळजी घ्यावी. याचबरोबर डासांना प्रतिबंध करतील अशा उपायांचा वापर घरात करावा. ताप आल्यास दुखणे अंगावर न काढता डॉक्टरांना दाखवावे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे. याबाबत खराडीतील मणिपाल रुग्णालयातील तज्ज्ञ डॉ. विचार निगम म्हणाले की, डासांमुळे होणारे रोग हे पावसाळ्यामध्ये नेहमी वाढतात. त्यामुळे प्रत्येक वयोगटाला त्यांच्यापासून धोका असतो. हिवतापानंतर डेंग्यू आणि चिकुनगुणिया आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या आजारांमुळे ताप, सांधेदुखी आणि अंगदुखी अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आणखी वाचा-पुणे: रिंग रोड प्रकल्पबाधितांसाठी खुशखबर: मुदतीत जमीन दिल्यास मिळणार ‘एवढा’ मोबदला महापालिकेकडून १७२ जणांना नोटिसा महापालिकेने डासांच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत ठरणारी ठिकाणे शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. निवासी इमारती आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये डासांची उत्पत्ती होणारी डबकी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. यंदा जानेवारी ते जून कालावधीत अशा १७२ नोटिसा बजावण्यात आल्या असून, ९३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, असे डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.