विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही पक्षांना हिंदुत्वाची शाल पांघरावी लागत आहे, असं म्हणत टोला लगावला. यानंतर पत्रकारांनी हा नेमका टोला कोणाला लगावला? जुन्या मित्राला की होऊ घातलेल्या नव्या मित्राला? रोख कोणाकडे आहे? असा सवाल केला. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते मंगळवारी (१९ एप्रिल) पुण्यात 'भाजपा : काल आज आणि उद्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आले असताना पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्रात फार मोठे साहित्यिक आहेत, त्यांनी १५-२० वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकात त्यांनी सांगितलं की हिंदुत्वाची शाल कोणी पांघरली आहे आणि खरं हिंदुत्व कोणाच्या रक्तात आहे. त्यामुळे ते पुस्तक जरूर वाचावं. त्याची माहिती मी तुम्हाला देईल. मी कोणाला बोललो आहे हे त्यांनाही समजलं आहे आणि जनतेलाही समजलं आहे." राज ठाकरेंनी पांघरलेली शाल जुनी की नवी? राज ठाकरेंनी देखील शाल पांघरलेली दिसतेय. ती जुनी शाल आहे की नवी शाल आहे? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर ते राज ठाकरे यांची शाल जुनी आहे की नवी हे येणारा काळ ठरवेल, असं उत्तर दिलं. आमचा घाव वर्णी बसला आहे. भ्रष्टाचाऱ्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्यामुळे भाजपाचा पोलखोल दौरा थांबणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं. हेही वाचा : “दबाव आणला तेव्हा भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं की…”, फडणवीसांचं वक्तव्य राज ठाकरे यांना यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यासाठी सुरक्षा पुरवली जाणार की नाही, असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी याबद्दल मी काही सांगू शकणार नाही. याबाबत त्या त्या राज्याच्या संबंधित व्यक्तिंना विचारावं असं उत्तर दिलं.