सावित्रीबाई फुले यांचा पुतळा किंवा स्मारक बांधून थांबता येणार नाही, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते, तेव्हा बोलत होते. यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील कामाचा उल्लेख करत त्यांच्या विचारावर चालण्याची गरज असल्याचं म्हटलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे ही आनंदाची बाब आहे. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्रीया सक्षम झाल्या. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी उभ्या देशाला संघर्ष शिकवला आहे. सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे समाजात बदल होण्यास मदत झाली.”
“सावित्रीबाईंचा पुतळा किंवा स्मारक बांधून थांबता येणार नाही”
“महात्मा फुले यांचं निधन झाल्यानंतर सत्यशोधक चळवळ पुढे नेण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलं. व्यसनमुक्ती आणि प्लेगच्या साथीत त्यांनी काम केले. त्यामुळे पुतळा किंवा स्मारक बांधून थांबता येणार नाही, तर आपण त्यांच्या विचारावर चालण्याची गरज आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
“शाळा सुरू करून समाजात बदल घडविण्याचे काम केले”
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी व्यसनमुक्ती, दुष्काळ आणि प्लेगच्या साथीत काम केले. त्याही पेक्षा शाळा सुरू करून समाजात बदल घडविण्याचे काम केले. आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करीत आहोत ही आनंदाची बाब आहे.”
“आता काही केलं, तर बॅनरबाजी केली जाते”, ठाकरेंचा अप्रत्यक्ष मोदींना टोला
मला सर्वांना सांगावे वाटते की, आता काही केलं, तर बॅनरबाजी केली जाते. जाहिरात केली नाही, तर मत कसं मिळणार असं बोललं जातं. मात्र, तेव्हा असं नव्हतं, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.