पुणे : ‘वाल्मीकींच्या रामायणावर आधारित असले, तरी ग. दि. माडगूळकर यांची अलौकिक प्रतिभा ‘गीत रामायणा’ला असामान्य काव्याचा दर्जा देऊन गेली. म्हणूनच ‘वाल्मीकीच्या भास्कराचे गदिमांच्या रूपाने झाले चांदणे मराठी’ असे म्हटले जाते ते किती सार्थ आहे, याची प्रचिती गेली सात दशके आपण घेत आहोत,’ असे मत ज्येष्ठ कवयित्री डाॅ. अरुणा ढेरे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

डाॅ. रा. चिं. ढेरे संस्कृती-संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित ‘बहुरूपी रामकथा : अभिजात आणि प्रादेशिक’ या व्याख्यान मालिकेचा समारोप ‘गीत रामायणाचे काव्यसौंदर्य’ या विषयावरील डाॅ. अरुणा ढेरे यांच्या व्याख्यानाने झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. चैत्राली अभ्यंकर यांनी ‘गीत रामायणा’तील काही गीते सादर केली.

डाॅ. ढेरे म्हणाल्या, ‘भारतीय संस्कृतीमध्ये राम म्हणजे सुख आणि आयुष्याचा अर्थ. म्हणून आपण ‘जीवनात राम नाही’ असे म्हणतो. रामायणामध्ये राम आणि आयन हे दोन शब्द आहेत. आयन म्हणजे प्रवास. गदिमांच्या गीत रामायणचा प्रभाव आपल्यावर इतका होता, की गीत ऐकताना रेडिओला हार अर्पण केला जात असे. गदिमांचे गीत आणि सुधीर फडके यांचे संगीत अशा सुंदर मिलाफातून ही अजरामर कलाकृती जन्माला आली. गीत रामायणाच्या निर्मितीतून या दोघांच्या आयुष्याचे सार्थक झाले. अदभुत कलाकृती जन्माला आली. हे गीतात्मक आख्यान ऐकताना आपण श्रीमंत होतो. गदिमांच्या शब्दसृष्टीने गीत रामायण हे सामान्य काव्य राहिले नाही तर ते मर्यादा पुरुषोत्तमाचे चरित्र झाले.’

ढेरे म्हणाल्या, ‘वाल्मीकी यांच्या काव्याची गदिमांनी चोरी केली असे म्हणणे एका अर्थाने खरेही आहे आणि खोटेही आहे. याचे कारण थोर प्रतिभावंत सहस्र मुखांनी बोलत असतो. ज्याचे प्रजेवर प्रेम आहे, अशा दशरथ राजाला पुत्रप्राप्ती नाही ही भावना ‘कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला तरी’ या काव्यपंक्तीतून व्यक्त होतो. राम हा फक्त दशरथाचा नाही, तर साऱ्या समाजाचा आहे, अशी भावना मांडणाऱ्या गदिमांचा भाषिक आविष्कार वेधक तर आहेच पण, काव्याचा अर्थविस्तार मनोहारी आहे.’

‘किती यत्ने मी पाहिली तूंते, लीनते, चारुते सीते’ या गीतामध्ये ‘हे तुझ्यामुळे गे झाले तुजसाठी नाही केले’ असे म्हणताना राम आणि सीतेचा संयम आणि सूचकता दिसते. कुठे शब्द आणि कुठे मौनाचा संक्षेप हे पेच गदिमांनी अलगदपणे सोडवले,’ याकडे ढेरे यांनी लक्ष वेधले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरोगामित्व आणि प्रतिगामित्व या दाेन छावण्यांच्या मध्ये झेंडे उभारलेले असताना एक मोकळा प्रदेश असतो. त्याला ‘नो मॅन्स लँड’ समजण्याची चूक आपल्याकडून होते. पण, याच प्रदेशात समन्वयशील विवेकवंतांच्या पाऊलखुणा उमटलेल्या दिसतात. आपल्याला त्या पाऊलखुणांचा मागोवा घेत जायला हवं. गदिमांसारखा कलावंत त्याच पाऊलखुणांचा शोध घेताना दिसतो. डाॅ. अरुणा ढेरे, ज्येष्ठ लेखिका