पुणे : ‘आता पुढील काळात एनडीएमध्ये येऊ इच्छिणाऱ्या मुलींनी कशालाही घाबरू नये. केवळ स्वतःवर विश्वास ठेवावा, सारे काही शक्य आहे. आपल्याला काय करायचे आहे ते ठरवून तयारी करा. मग ते डॉक्टर असो, अभियांत्रिकी असो वा अन्य काहीही… आयुष्यात अडथळे, आव्हाने असणारच आहेत. मात्र, आपण पुढेच जात राहिले पाहिजे,’ असा सल्ला एनडीएतून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांच्या पहिल्या तुकडीतील छात्रांनी देशभरातील मुलींना दिला.

एनडीएतील १४८व्या तुकडीतून १७ महिला छात्रांची तुकडी उत्तीर्ण झाली. एनडीएच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑगस्ट २०२२मध्ये महिला छात्रांना प्रवेश देण्यात आला होता. या महिला छात्रांमधील कोणाला सैन्यदलाची पार्श्वभूमी होती, कोणाला नव्हती. मात्र, एनडीएचा दरवाजा उघडल्यावर त्यांनी आत्मविश्वासाने प्रयत्न केला. निवडीनंतर तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण १७ छात्रांनी पुरुष छात्रांच्या बरोबरीने पूर्ण करत दीक्षान्त संचलनानंतर अंतिम पाऊल टाकून नवा इतिहास रचला आहे. आता त्या लष्कर, हवाई दल, नौदलाच्या पुढील प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. त्यामुळेच त्या देशभरातील लाखो मुलींसाठी नवी प्रेरणा ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘लोकसत्ता’ने काही महिला छात्रांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

कॅप्टन इशिता सांगवान म्हणाली, माझ्या कुटुंबातून कोणीही लष्करात नाही. मी रुजू झाले तेव्हा माझ्यासाठी सगळेच नवे होते. रोजचा दिवस नवीन काही तरी घेऊन येत होता. रोज नवे काही तरी शिकायला मिळत होते. तीन वर्षे हा मोठा कालावधी आहे. त्यातील काही दिवस उत्साहाचे, काही दिवस कमी उत्साहाचे असतात. मात्र, सहाध्यायी, मार्गदर्शक हे सदैव उपलब्ध होते. आता मागे वळून पाहताना तो किती भारी अनुभव होता ते जाणवते. सुरुवातीला पुरुष छात्रांबरोबर वेगळे वाटायचे. मात्र, कालांतराने आम्ही एकरूप झालो. या तीन वर्षांच्या काळात आयुष्यभरासाठीचे मित्र मिळाले. आमच्यानंतर आलेल्या छात्रांशीही आमचे छान जमले, त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली, त्यांच्याकडूनही शिकायला मिळाले. ही शिकण्याची प्रक्रिया फार आनंदाची होती. गेली तीन वर्षे अंतिम पाऊल टाकण्याचे, आम्ही एनडीएचे माजी छात्र होण्याचे स्वप्न पाहत होतो. सुदान इमारत आमच्यासाठी प्रेरणादायी होती.

कॅप्टन शीतल मेहलानीला लष्कराची पार्श्वभूमी नाही. लष्करात येणारी तिची पहिलीच पिढी आहे. ‘बारावी पूर्ण झाली तेव्हा माझे काही मित्र ‘एनडीए’ची परीक्षा देत होते. मला ‘एनडीए’बाबत काहीच माहीत नव्हते. मात्र, आपल्याला काही तरी वेगळे करायचे आहे असे वाटत होते. त्यामुळे मीही ‘एनडीए’साठी अर्ज केला आणि पात्रही ठरले. ‘एनडीए’मध्ये आल्यावरच मला सैन्यदलाविषयी खूपशी माहिती मिळाली. त्यातून प्रेरणा मिळत राहिली. सुरुवातीला मला जमणार नाही, शारीरिकदृष्ट्या अवघड असेल, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्ष सुरुवात झाल्यावर आपल्याला जमणार नाही ही मानसिकता असल्याचे लक्षात आले. प्रत्येकाला जमू शकते. त्यामुळेच आम्ही सर्व १७ जणींनी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे,’ असे तिने सांगितले.

कॅप्टन हरसिमरन कौर अभियांत्रिकी प्रवेशाच्या दृष्टीने ‘जेईई’ची तयारी करत होती. पुढे जाऊन कम्बाइन डिफेन्स स्टाफ परीक्षा देण्याचाही तिचा विचार होता. मात्र, तिच्या मित्राकडून एनडीएमध्ये महिलांचे प्रवेश सुरू झाल्याचे कळल्यावर लगेचच तिने एक प्रयत्न म्हणून एनडीएच्या परीक्षेचा अर्ज भरला आणि तिची निवड झाली. ‘एनडीएतील तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण होणे हा आनंदाचा क्षण आहे. माझ्या आई-वडिलांना अतिशय अभिमान वाटत आहे. माझा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. अजून बरेच काही साध्य करायचे आहे,’ असे तिने सांगितले.

कॅप्टन स्वाती दुसादचे वडील लष्करात कार्यरत आहेत. त्यामुळे लष्करात जाण्यासाठी तेच तिच्याठी प्रेरणा देणारे होते. सुरुवातीला तिला अभियांत्रिकी अभ्यास करण्याची इच्छा होती. कालांतराने तिला सशस्त्र दलांनी तिच्या मनात ओढ निर्माण केली. त्यामुळे ‘एनडीए’ महिलांसाठी खुले होताच तिने लगेचच अर्ज केला. ‘एनडीएतील तीन वर्षे खूप काही शिकवणारी होती,’ अशी भावना तिने व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वजण केवळ छात्रच…

पुरुष छात्रांविरुद्ध बोलण्यासारखे काहीच नाही. त्यांनी आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला, मदत केली. खरे तर पुरुष छात्र, महिला छात्र असे म्हणणे चुकीचे आहे. आमच्यासाठी सगळे केवळ छात्र आहेत. तसेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) मार्गदर्शक, शिक्षकांनीही मदत केली, अशी प्रातिनिधिक भावनाही महिला छात्रांनी व्यक्त केली.