गीता धर्म मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या संपूर्ण गीता पठण स्पर्धेत भाग घेऊन यश प्राप्त केल्यानंतर पुण्यातील सहा जणींनी शृंगेरी येथे चालणाऱ्या गीता ज्ञानयज्ञात भाग घेऊन तेथेही शंकराचार्याच्या हस्ते बक्षीस मिळविले.
गीता धर्म मंडळ या संस्थेतर्फे मंडळामध्ये तसेच पुण्यात विविध भागांत विनामूल्य गीता संथावर्ग घेतले जातात. तसेच दरवर्षी विविध स्पर्धाचेही आयोजन केले जाते. त्यात संपूर्ण गीता कंठस्थ अशी एक स्पर्धा असते. गीतेचे अठरा अध्याय पाठ करणे या स्पर्धेत अपेक्षित असते. विविध वयोगटांत ही स्पर्धा होते.
या स्पर्धेत भाग घेऊन पुण्यातील रिमा परांजपे, मीनाक्षी कुलकर्णी, ममता जोशी आणि अश्विनी कुलकर्णी यांनी उत्तम यश मिळविले. या स्पर्धेच्या वेळी या चौघींना शृंगेरीत चालणाऱ्या गीता ज्ञानयज्ञाची माहिती समजली. त्या उपक्रमातही सहभागी होण्याची चौघींची इच्छा होती. त्यानुसार चौघींनी तयारी केली. ज्यांची संपूर्ण गीता पाठ आहे ते शृंगेरीला गीता ज्ञानयज्ञात जाऊन गीता म्हणून दाखवू शकतात. त्यानुसार या चौघी जणींनी शृंगेरीत जाण्यासाठी अर्ज वगैरेची प्रक्रिया केली.
प्रत्यक्ष अर्ज पाठवल्यानंतर स्पर्धेचा दिनांक कळवण्यात आला. त्यानुसार तयारीसाठी हाताशी अतिशय कमी कालावधी होता. त्यादृष्टीने चौघींनी सराव केला. शृंगेरीतील परीक्षेच्या वेळी जयश्री गोडसे आणि माधवी मिराशी या पुण्यातील आणखी दोघी जणी त्यांना तेथे भेटल्या. या सहा जणींची तेथे गीता परीक्षा झाली आणि त्यात सहाही जणींनी उत्तम यश मिळवले. या स्पर्धेत गीतेच्या कोणत्याही अध्यायातील कोणतेही श्लोक विचारले जातात व ते म्हणून दाखवायचे असतात. स्पर्धेतील यशानंतर शंकराचार्याच्या हस्ते या सगळय़ा जणींना प्रशस्तिपत्र, प्रसाद व रोख बक्षीस देण्यात आले. कर्नाटकातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या, मंदिरांच्या आणि आद्यशंकराचार्याचे जेथे काही काळ वास्तव्य होते अशा भागात जाऊन तेथे गीता पठणाची संधी मिळाल्यामुळे तो अनुभव आनंददायी ठरला, असे रिमा परांजपे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.