विरोधकांवर टीका करण्याच्या नादात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केल्याचा प्रकार घडला. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप उमेदवारांना पारदर्शकतेची शपथ देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बापट यांच्याकडून ही घोडचूक झाली. यावेळी विरोधकांवर टीका करण्याच्या ओघात बापट म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ६५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर अनेक जनावरे मरण पावली. मात्र, ही चूक लक्षात येताच बापट यांनी लगेच सारवासारव करत देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारच्या कारभाराचे गोडवे गाण्यास सुरूवात केली. भाजपच्या सरकारच्या काळात शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू झाला आहे. याशिवाय, इंद्रायणीपासून मुळा-मुठेपर्यंत विकासाचे वारे वाहत आहेत, असे बापट यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीदेखील भाषणादरम्यान अनावधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. अहमदनगर येथे झालेल्या या सभेत दानवेंनी सुरूवातीला काँग्रेसचा समाचार घेतला. दानवे म्हणाले की, तब्बल २० वर्षे मी लोकसभेत होतो. त्याकाळात मनमोहन सिंग दहा वर्ष पंतप्रधान होते. लोकसभेत पाय ठेवल्यावर रोज पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींकडे मी पाहायचो. ते आज हसतील, उद्या तरी हसतील , परवा तरी हसतील असे वाटायचे. पण देवाची शप्पथ घेऊन सांगतो. गेल्या दहा वर्षात त्यांना एकदाही हसताना पाहिलेले नाही. पंतप्रधानपदाच्या काळात मनमोहन सिंग यांचा हसतानाचा फोटो दाखवणाऱ्याला मी एक लाखांचे बक्षिस देईन, असे दानवेंनी म्हटले. हे बोलताना दानवे यांनी एका वाक्यात मनमोहन सिंग यांच्याऐवजी नरेंद्र मोदींवर उपरोधिकपणे टीका केली. त्यामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला होता.