पुणे : आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही. मात्र तुमची ताकद मला हवी आहे. लढायचे असेल तर सोबत राहा, असे भावनिक आवाहन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील शिवसेना पदाधिकऱ्यांना केले. शिवसेनेला संपवण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव आहे, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
मातोश्री येथे पुणे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची व सर्व माजी नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी ठाकरे यांनी हे आवाहन केले. भाजपासह शिवसेनेतून बंड करून निघालेल्या आमदारांवर ठाकरे यांनी टीका करतानाच हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले. शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यावेळी उपस्थित होत्या.
उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या घटनेवरून राज्यात घटनेची पायमल्ली करून कशा पद्धतीने कारभार सुरू आहे, याची माहिती दिली. एकीकडे न्यायालयात बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न प्रलंबित असताना दुसकीकडे बहुमत चाचणी, विश्वासदर्शक ठराव मांडला जातो, यावर त्यांनी बोट ठेवले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात आता शिवसेना न्यायालयाचे दरवाजेही ठोठावणात असून अरुणाचल प्रदेश सारखा निकाल लागण्याची शक्यता ठाकरे यांनी व्यक्त केली.
शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, यापुढे आपण एकजुटीने आणि ताकतीने काम करायचे आहे. उद्धव ठाकरे यांनी साद घालत तसेच बळ दिल्याने शिवसैनिकांना ताकद मिळाल्याची भावना पदाधिका-यांनी व्यक्त केली. पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर हे ही उपस्थित होते