भारतातील फोर्जिग उद्योगातील पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात अग्रेसर असलेल्या कल्याणी उद्योग समूहाचे संस्थापक आणि ज्येष्ठ उद्योगपती डॉ. नीलकंठ कल्याणी यांचे आज सायंकाळी साडेपाच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी सुलोचना, बाबा व गौरीशंकर हे दोन मुलगे, कन्या सुगंधा हिरेमठ आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर रविवारी (२५ ऑगस्ट) पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नीलकंठ कल्याणी यांनी शेतीच्या व्यवसायातून उद्योगक्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांचे आजोबा नारायणशेठ हे शेंगदाण्याचे मोठे व्यापारी होते, तर वडिलांचा हळदीचा व्यवसाय होता. किलरेस्करांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या औद्योगिक चळवळीशी नाते जोडत असताना, कल्याणी यांनी त्या विषयातील माहिती मिळवण्यास सुरुवात केली आणि जगातून आपल्याला कशी आणि कोठून मदत मिळू शकेल, याचा अभ्यास सुरू केला. केवळ वाणिज्य विषयातील पदवी हाताशी असताना आणि संबंधित विषयाचे कोणतेही ज्ञान नसताना, त्यांनी या क्षेत्रात उडी घ्यायचे ठरवले. कारण त्यांचा स्वत:च्या कर्तृत्वावर कमालीचा विश्वास होता.
पुण्यातील औद्योगिक क्षेत्रात नीलकंठ कल्याणी यांनी पाऊल ठेवायचे ठरवले, तेव्हा त्यांना शंतनुराव किलरेस्कर यांची खूप मदत झाली. स्वातंत्र्यचळवळीच्या वैचारिक मुशीत घडत असताना कल्याणी यांनी देशाला गरज असलेल्या क्षेत्रात उतरण्याचे ठरवले आणि लोखंडाच्या ओतकामासाठी (फोर्जिग) आवश्यक असणाऱ्या उद्योगात पाऊल ठेवण्याचे ठरवले. १९६१ मध्ये पुण्यात मुंढवा येथे भारत फोर्ज या उद्योगाची स्थापना केल्यानंतर अथक प्रयत्नांनी त्यांनी हा उद्योग नावारूपाला आणला. त्यानंतर काही वर्षांतच भारत फोर्ज हा उद्योग नावारूपाला आला आणि त्याने जगाच्या विविध भागात आपले बस्तान बसवण्यास सुरुवात केली.

नीलकंठ कल्याणी हे कल्पक उद्योगपती असल्याने त्यांनी कल्याणी उद्योग समूहाच्या विस्ताराला सुरुवात केली. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून (कल्याणी शार्प) ते कृषी क्षेत्राला लागणाऱ्या विविध उत्पादनांपर्यंत अनेक वस्तूंचा समावेश होता. याशिवाय त्यांनी ‘कल्याणी फोर्ज’, ‘कल्याणी ब्रेक’ हे उद्योग स्थापन केले. ते वर्ल्ड फोर्जिग असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यांचे आत्मचरित्र ‘फोर्जिग अहेड’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.

धोका पत्करण्याचे शिक्षण
डॉ. नीलकंठ कल्याणी पुण्याच्या बीएससीसी महाविद्यालयात शिकत असताना, त्यांच्या वडिलांनी सहज येऊन तेथे शिकवत असलेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेतली. त्यामध्ये व्यवसायात धोका स्वीकारताना कोणती काळजी घ्यायला हवी, याचा समावेश नसल्याचे त्यांच्या लक्षात येताच, त्यांनी नीलकंठरावांना शिक्षण सोडण्याचा सल्ला दिला व्यवसाय हा धर्म असला पहिजे आणि त्यात सचोटीशिवाय अन्य कशालाही थारा असता कामा नये, ही वडिलांची शिकवण आपण आयुष्यभर लक्षात ठेवली, असे डॉ. कल्याणी नेहमी सांगत.