पुणे : ‘सध्या संभ्रम आणि अस्थिरतेचा काळ आहे. जागतिकीकरण, धर्मांधता आणि सत्तालालसा यातून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. समकालीन कवितांनी बाहेरच्या कोलाहलाचा वेध घेणे आवश्यक आहे,’ असे मत भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी शुक्रवारी व्यक्त केले.‘सृजनसंवाद’च्या वतीने अंजली कुलकर्णी लिखित ‘असण्याचे सुंदर ओझे’ आणि ‘शाबूत राहो हे लव्हाळे’ या कवितासंग्रहांचे प्रकाशन कवयित्री डॉ. मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी देशमुख बोलत होते. समीक्षक डाॅ. रणधीर शिंदे, प्रकाशक गीतेश शिंदे या वेळी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ‘माणुसकी बोथट होत असून, गेल्या तीन दशकांतील बदलांमुळे जगणे विखारी झाले आहे. सध्याची समाजव्यवस्था आपल्या पदरात भीतीचे जगणे टाकत आहे. समाजाचा सांस्कृतिक ऱ्हास होतो आहे. अशा बदलांचा वेध समकालीन कवितांमधून घ्यायला हवा. कुलकर्णी यांची कविता सहिष्णुतेची कास धरणारी आहे. पुरुषकेंद्री असलेल्या भांडवलशाही आणि धर्मसत्तेमध्ये स्त्री दुय्यम ठरत आहे. त्यावर परखडपणे व्यक्त होणाऱ्या समकालीन कवितांनी आपण अस्वस्थ होतो. बदलासाठी मनोभूमिका निर्माण करण्याची ताकद साहित्यामध्ये असते.’
‘कविता हा आत्मशोध असतो. सध्याचा कालखंड कोलाहलाचा, अनामिक भयाचा आणि अस्वस्थतेचा आहे. या वातावरणात कवितेचे पर्यावरण दूषित होऊ नये,’ अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.शिंदे म्हणाले, ‘कुलकर्णी यांची कविता हरवलेल्या माणूसपणाला स्पर्श करते. नदी आणि स्त्रीत्व यांचे नाते जिव्हाळ्याचे असते. त्यातून संस्कृतीचे आदिबंध व्यक्त होतात. कुलकर्णी यांच्या कविता अशाच आदिबंधांवर भाष्य करतात.’निरुपमा महाजन यांनी सूत्रसंचालन केले. शलाका माटे यांनी आभार मानले.