केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून यात मुलींनी बाजी मारली आहे. दिल्लीची इरा सिंघल देशात, तर पुण्याची अबोली नरवणे राज्यात पहिली आली आहे. अबोली देशात ७८ व्या स्थानावर आहे. राज्यातील सुमारे शंभर उमेदवारांची निवड झाली आहे. मात्र, पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील फक्त ४ उमेदवारांना स्थान मिळाले आहे. पहिल्या दोनशेमध्येही १० ते १५ उमेदवारांनाच स्थान मिळाले आहे. गेली दोन वर्षे पहिल्या वीस उमेदवारांमध्ये राज्यातील उमेदवारांनी स्थान मिळवले होते. मात्र, या वर्षी या परंपरेला धक्का बसला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१४ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून, पहिल्या चारही स्थानावर मुली आहेत. इरा सिंघलनंतर दुसऱ्या क्रमांकावर केरळ येथील रेणू राज आहे. दिल्लीच्याच निधी गुप्ताने तिसरा, तर वंदना राव हिने चौथा क्रमांक पटकावला आहे.
प्रशासकीय सेवा, विदेश सेवा, पोलीस सेवा आणि केंद्रातील अ आणि ब दर्जाच्या सेवांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. डिसेंबर २०१४ मध्ये मुख्य परीक्षा झाली होती, तर एप्रिल ते जून या कालावधीत मुलाखती झाल्या. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच राज्यातील जवळजवळ शंभर उमेदवारांची या परीक्षेत निवड झाली आहे. ही संख्या वाढली असली, तरी भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड होणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत निवड होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण यावर्षी वाढले आहे. गेली काही वर्षे साधरण ७५ ते ८० उमेदवार उत्तीर्ण होत होते. असे असले तरी रँक घसरल्यामुळे आयएएससाठी निवड होणारे महाराष्ट्रातील उमेदवार कमी होणार आहेत.
या वर्षी राज्यातील साधारण ६० हजार उमेदवार पूर्वपरीक्षेला बसले होते. त्यातील साधारण दोनशे उमेदवारच मुलाखतीपर्यंत पोहचू शकले. मात्र, मुलाखत देणाऱ्यांपैकी राज्यातील जवळपास पन्नास टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात पहिल्या क्रमांकावर मुलगी असली, तरी एकूण उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे. राज्यातील साधारण १२ ते १५ मुलींनीच यश मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पारदर्शी काम करण्याचे ध्येय – अबोली
‘गुणवत्ता नसेल तरी कष्ट करून यश मिळवता येते. मात्र, कष्ट करण्याची तयारीच नसेल, तर गुणवत्ता असूनही उपयोग होत नाही,’ या आईने दिलेल्या कानमंत्रालाच माझ्या यशाचे श्रेय आहे. प्रामाणिकपणे आणि पारदर्शी काम करणे हे यापुढचे ध्येय आहे,’ अशी भावना राज्यात पहिल्या आलेल्या अबोली नरवणे हिने व्यक्त केली आहे. अबोलीने फग्र्युसन महाविद्यालयांतून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. तिची आई डॉ. मीनल नरवणे या यशदामध्ये कार्यरत आहेत, तर वडील सुनील र्मचट नेव्हीतून निवृत्त झाले आहेत. गेल्या वर्षीही अबोलीची प्रशासकीय सेवेत निवड झाली होती. गेल्या वर्षी देशात १६३ वी रँक मिळवून भारतीय महसूल सेवेत ती दाखल झाली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra four girls in top 100 list in upsc
First published on: 05-07-2015 at 01:33 IST