पुणे : देशभरात एकूण ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात राज्यातील तब्बल ५५ नदीपट्टे असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील मिठी, पुण्यातील मुळा-मुठेसह अनेक नद्या प्रदूषित असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) अहवालातून स्पष्ट झाले आहे.सीपीसीबीच्या जल गुणवत्ता व्यवस्थापन विभागाने ‘पोल्युटेड रिव्हर स्ट्रेचेस फॉर रिस्टोरेशन ऑफ वॉटर क्वालिटी’ हा अहवाल तयार केला आहे.यामध्ये देशभरातील ६०३ नद्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. यापैकी ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील २७९ नद्यांमधील ३११ नदीपट्टे प्रदूषित असल्याचे आढळून आले. त्यात सर्वाधिक ५५ प्रदूषित नदीपट्टे महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल मध्य प्रदेश (१९) बिहार आणि केरळ (१८), कर्नाटक आणि उत्तर प्रदेश (१७) या राज्यांमध्ये नदी प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे.

राज्यातील भीमा, मिठी, मुठा, सावित्री, गोदावरी, कन्हान, मुळा, पवना, इंद्रायणी, अंबा, अमरावती, बोरी, बुराई, भातसा, बिंदुसरा, चंद्रभागा, दारणा, घोड, गोमाई, गिरणा, हिवरा, कलू, कन, कोलार, कोयना, कृष्णा, कुंडलिका, मंजिरा, मोर, मोरणा, मूचकुंडी, मोरणा, नीरा, पांझरा, पाताळगंगा, पैनगंगा, पेढी, पेहलर, पूर्णा, रंगावली, सीना, सूर्या, तानसा, तापी, तितूर, उल्हास, उरमोडी, वैतरणा, वशिष्टी, वेण्णा, वाघूर, वैनगंगा, वर्धा, वेणा या नद्यांतील काही भाग प्रदूषित झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. असे असले तरी २०१८ च्या तुलनेत यावेळी नदीपट्टय़ांतील प्रदूषणात घट झाल्याची सकारात्मक बाब अहवालातून समोर आली आहे. २०१८ मध्ये ३५१ नद्यांतील ३११ नदीपट्टे प्रदूषित होते.

प्रदूषण कशामुळे?
शहरे आणि उद्योगांमधील सांडपाणी नदीत सोडले जाते. यातील रासायनिक घटक तसेच इतर टाकाऊ वस्तूंमुळे नदीचे पाणी मोठय़ा प्रमाणात दूषित होते. पर्यायाने त्या भागातील नदीच्या परिसंस्था धोक्यात येतात आणि त्याचा दुष्परिणाम निसर्ग आणि मानवी आरोग्यावर होतो.