पुणे : ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य सहकारी बँकेनेही पुढाकार घेतला असून, साखर कारखान्यांना सहा टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्जपुरवठा करण्यासाठी सर्व जिल्हा बँकांनाही निधी देण्यात येणार असून, त्यासाठी पाचशे कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आल्याची माहिती राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी येथे दिली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) येथील कार्यक्रमावेळी त्यांनी ही घोषणा केली. ऊस शेतीमध्ये एआयचा वापर करण्यासाठी राज्यातील एक लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजारांची मदत केली जाणार आहे. त्यासाठी व्हीएसआय, राज्य शासन, साखर कारखाने शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करणार आहेत. साखर कारखाने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ६ हजार ७५० रुपये अनुदान देणार आहेत. त्यामुळे कारखान्यांना निधीची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य सहकारी बँकेकडून कारखान्यांना थेट सहा टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्यात येणार आहे.
कारखान्यांकडून मागण्यात आलेला निधी बँकांकडून दिला जाईल. राज्यातील जिल्हा बँकांना कारखान्यांना ही रक्कम देण्यासाठी राज्य सहकारी बँकेने पाचशे कोटींची अतिरिक्त तरतूद केली आहे, असे अनास्कर यांनी सांगितले.