बारामती : बारामतीच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलविरोधात कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांच्या पॅनेलबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षही रिंगणात उतरला असल्याने उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. इंदापूरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष तटस्थ भूमिकेत होता. मात्र, या कारखान्याच्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी ५९३ अर्ज दाखल झाले आहेत.
माळेगाव कारखान्याची निवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जात आहे. माजी अध्यक्ष रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलचे मोठे आव्हान आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षही ताकद दाखविणार आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर मेळावा घेत या कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे जाहीर केले आहे. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी दोन वेळा या कारखान्यावर वर्चस्व सिद्ध केले आहे. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने माघार घेतली होती. मात्र, या कारखान्याच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. तसेच कष्टकरी शेतकरी समितीचेही पॅनेल केले जाणार असल्याची सांगितले जात आहे. त्यामुळे या कारखान्याच्या निमित्ताने बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्जांची २८ मे रोजी छाननी होणार आहे. २९ मे ते १२ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. १३ जून रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीसाठी कोणाला संधी मिळणार आणि किती पॅनेल होणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.