आपल्या माणसांसमोर मन मोकळे करायचे नाही का? इतकाही अधिकार या देशात राहिला नाही का?, असे सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात खासदार सुप्रिया सु‌ळे यांनी उपस्थित केले. काटेवाडी येथील कार्यक्रमात गावकऱ्यांशी संवाद साधताना श्रीनिवास पाटील यांनी केलेले भाषण ही अजित पवार यांच्यावर केलेली टीका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली. त्यासंदर्भात बारामतीमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा >>> पुणे : निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर? इनकम टॅक्सचे आता आहे २४x७ लक्ष…..

श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार हे कायमच माझा प्रचार करत आले आहेत. त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली असे मला वाटत नाही. काटेवाडी हे श्रीनिवास पवार यांचे गाव आहे. त्यांच्या मित्रपरिवारासमोर त्यांनी मन मोकळ केले इतकेच आहे. एखाद्या माणसाने आपल्या घरात, आपल्या माणसांसमोर मन मोकळे करायचे नाही का? इतकाही अधिकार या देशात राहिलेला नाही का, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

बारामतीमध्ये शरद पवार यांना हरविणे हे एकच लक्ष्य असल्याचे विधान उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याचा समाचार घेताना विकासाचे मुद्दे, दुष्काळाची परिस्थिती, महागाई, बेरोजगारी, टँकर, पिकांना हमीभाव असा मुद्दे न घेता केवळ शरद पवार यांना हरविण्याचे ध्येय ठेवणे हे दुर्देवी आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

हेही वाचा >>> इंदापूर हत्या प्रकरण: मैत्रिणीला भेटायला आलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला!

हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. वैचारिक लढाई आहे. ज्या पद्धतीने संपविण्याची भाषा, धमक्या देतात ही भाषा राज्याला शोभत नाही. जे मनात आहे ते त्यांच्या ओठावर आले. सूडाचे आणि गलिच्छ राजकारण ते करतात. विकासाचा मुद्दा त्यांच्यासाठी महत्वाचा नाही हे  समोर आले, अशी टिप्पणी सुळे यांनी बारामतीमध्ये बोलताना केली.

कोणत्या पक्षाला निवडणूक रोखे कुठून मिळाले हे पारदर्शकपणे सांगावे आणि केंद्र शासनाने याबाबत तातडीने श्वेतपत्रिका काढावी. या बाबत माध्यमांतून आलेली माहिती धक्कादायक आहे, लोक संभ्रमात आहे. सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे का? असा विचार येतो आहे. – सुप्रिया सुळे, खासदार