पुणे :  राज्यातील पीएमश्री शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांची वर्गनिहाय, विषयनिहाय पदे भरण्याचे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत. नियुक्त करण्यात येणारे मुख्याध्यापक, शिक्षक हे चार ते पाच वर्ष संबंधित पीएमश्री शाळांमध्ये नियमित राहतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार केंद्र शासन पुरस्कृत पीएमश्री योजनेअंतर्गत राज्यातील ८२७ शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळा उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरतील अशा पद्धतीने विकसित केल्या जाणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींची पीएमश्री शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

पीएमश्री शाळांना नजीकच्या शाळांना शाळांना समानता, समतापूर्ण आणि आनंदायी वातावरणात उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मार्गदर्शक शाळा म्हणून नेतृत्व करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात येणार आहे.  पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्तम सहसंबंध प्रस्थापित करून त्यांचा सहभाग आणि शिक्षणासाठी आनंदपूर्ण वातावरण निर्मिती करणे, तसेच विविध प्रशिक्षणामध्ये सहभागी होणे, प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करणे, योजनेची सुलभ अंमलबजावणी करणे यात मुख्याध्यापकांची महत्त्वपूर्ण भूमिका, जबाबदारी आहे.

शाळा विकसन आणि सातत्यपुर्ण नेतृत्व करण्यासाठी मुख्याध्यापक हा प्रमुख घटक आहे. या पार्श्वभूंमीवर २२ एप्रिल रोजी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अनिलकुमार सिंघल अध्यक्षतेखाली हैदराबाद आढावा सभा झाली. त्यात पीएमश्री शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुख्याध्यापक शिक्षकांची रिक्त पदे भरल्यास पीएमश्री शाळांमध्ये सातत्यपूर्ण आणि प्रभावी पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीची अंमलबजावणी करता येईल. त्यामुळे पीएमश्री शाळा विशिष्ट स्तरापर्यंत पोहोचून इतर शाळांना मार्गदर्शक ठरतील. या दृष्टीने पीएमश्री शाळांतील मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्यादृ ष्टीने आवश्यक शिक्षकांची वर्गनिहाय, विषयनिहाय पदे भरणे, संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक चार ते पाच वर्षे त्याच शाळेत नियमित राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.