एकमेकांना भेटल्यानंतर नमस्कार करताना, हस्तांदोलन करताना जय श्रीराम, जय हरी, जय महाराष्ट्र, जय भीम, जय गणेश असे म्हणण्याची पद्धत आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना भेटल्यानंतर रामराम घालण्यापेक्षा ‘जय राष्ट्रवादी’ म्हणावे, असे पत्र पिंपरीतील पक्ष कार्यालयात लावण्यात आले आहे.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेले जय राष्ट्रवादी अभियान यापुढे कायम सुरू ठेवावे, अशी अपेक्षा यानिमित्ताने कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभियान सुरू केले आहे. त्याचा दाखला देत राष्ट्रवादीच्या पिंपरी कार्यालयात सूचनाफलकावर लावलेल्या अशाच सूचनेने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. देशाचे नेते पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्वाभिमान सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी भेटल्यास ‘जय राष्ट्रवादी’ असा नमस्कार घालणे जरुरीचे आहे. सप्ताहाच्या निमित्ताने सुरू झालेले हे अभियान कायम स्वरूपी ‘जय राष्ट्रवादी’ म्हणण्याची सवय लावून आयुष्यभर लावून घेवू या, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात, चौकशी केली असता काही कार्यकर्त्यांनी ते स्वयंस्फूर्तीने लावले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपण ‘जय राष्ट्रवादी’ ची सवय लावून घेतली पाहिजे, असे पक्ष कार्यालयातून सांगण्यात आले.