पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेली विश्रांती कायम आहे. त्यामुळे १०० टक्के भरलेल्या खडकवासला धरणातील पाणीसाठा ९५ टक्क्य़ांवर आला आहे. तर, चारही धरणांमधील पाणीसाठा १३.८० अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा झाला आहे.

टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरण परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. जूनअखेरीला आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरले होते. या धरणामधून मुठा उजवा कालवा आणि मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आला होता. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने खडकवासला धरण ९५ टक्क्य़ांवर आले आहे.

टेमघर धरणक्षेत्रांत मंगळवारी दिवसभरात १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पानशेत धरण परिसरात केवळ एक मि.मी. पाऊस पडला. तर, वरसगाव आणि खडकवासला धरण परिसरात पावसाने विश्रांती घेतली.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात दिवसभरात १३ मि.मी. पावसाची नोंद झाली.

दरम्यान, जिल्ह्य़ातील गुंजवणी, निरा देवघर आणि भाटघर या धरणक्षेत्रांत तुरळक पाऊस पडला. गुंजवणी धरणात एक मि.मी., निरा देवघरमध्ये दहा, तर भाटघर धरणात दोन मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. अन्य धरण परिसरातही पावसाने दडी मारल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा उणे १६.३० टीएमसी एवढा झाला आहे.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा

(टीएमसी आणि टक्क्य़ांमध्ये)

टेमघर ०.९२   ५१.१६

वरसगाव ०५.३५  ४१.९०

पानशेत ०५.६४  ५१.१६

खडकवासला     ०१.८७  ९४.८०

एकूण साठा       १३.८० ४७.३४