पिंपरी चिंचवड: चिखलीमध्ये इंद्रायणी नदीच्या निळ्या पुररेषेतील ३६ बंगले पाडल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावल्याचे सर्वांनी पाहिलं. आज ही तिथे अनेक जण येऊन आपला पाडलेला बंगला पाहून डोळ्यात अश्रू आणि मोठी स्वप्न घेऊन परतत आहेत. या प्रकरणांमध्ये असुशिक्षित आणि सुशिक्षित व्यक्तींची फसवणूक झाली आहे.
आयटी अभियंता असलेल्या व्यक्तीने तिथे एक गुंठा जागा घेऊन बंगला उभारला होता. २० लाख रुपये गुंठा जागा घेऊन बंगल्याच स्वप्न पूर्ण केलं होतं. परंतु, तिथे ब्ल्यू लाईन निळी पूर रेषा आहे. याची कल्पना तिथल्या नागरिकांना नव्हती. निळी पुररेषा त्यांच्या बंगल्याच्या पलीकडे असल्याचं बिल्डर मनोज जरे ने सांगितलं होतं. आयटी अभियंत्यांच्या पत्नी मंगळवारी आपला पाडलेला बंगला बघण्यासाठी आल्या होत्या. दोन मुल आणि त्या त्यांच्या पाडलेल्या बंगल्याकडे एकटक बघत होत्या. डोळ्यादेखत स्वप्नांचा चुराडा झाला होता. घरातील काही साहित्य काढू दिल नाही.
ते साहित्य ही पाडलेल्या बंगल्यात गाडलं गेलं होतं. एक- एक गोष्ट त्या सांगत होत्या. कोरोनाकाळात त्यांनी जागा घेऊन बंगला बांधला होता. गेल्या दोन- तीन वर्षांपासून ते राहण्यासाठी आले होते. लाखोंचा कर्जाचा डोंगर असल्याचं त्यांनी सांगितलं. सुशिक्षित असून आयटी अभियंत्याची फसवणूक झाली, तिथं सर्वसामान्य नागरिकाच काय?. कधी स्वप्नात सुद्धा आम्हाला वाटलं नाही, की आमचा बंगला असा पाडला जाईल. अस सांगत असताना त्या भावुक झाल्या होत्या. नाव न लिहिण्याच्या अटीवर त्यांनी सर्व हकीकत सांगितली आहे. बिल्डर मनोज जरे ने फसवणूक केल्याचं उघडउघड आहे. सोमवारी ३६ बंगला धारकांची मनोज जरे सोबत बैठक पार पडली. यात तोडगा काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.