पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा बुधवारी (७ एप्रिल) विस्कळीत झाला. गुरुवारी (८ एप्रिल) सकाळी हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचे पालिकेने कळवले आहे. कडक उन्हामुळे ‘नको-नको’ झाले असतानाच, अचानक पाण्याची कमतरता जाणवणार आहे. पवना धरण येथील जलविद्युत निर्मिती केंद्रात बिघाड झाल्याने नदीत कमी प्रमाणात पाणी सोडले गेले. त्यामुळे रावेत बंधाऱ्याची पातळी कमी झाली. परिणामी जलउपसा कमी झाला. त्यामुर्ळे पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा बुधवारी विस्कळीत झाला असून तसाच तो गुरुवारी विस्कळीत राहील. जलसंपदा विभागाशी समन्वय साधण्यात आला असून पाणीपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचा प्रयत्ना सुरू आहे, असे निवेदन महापालिकेच्या वतीने बुधवारी जाहीर करण्यात आले. त्यानंतर पाण्याचा साठा करून ठेवण्यास पुरेसा वेळ मिळाला नसल्याची तक्रार दिवसभर होत होती. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा नियोजनशून्य कारभार असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात काठोकाठ पाणी असतानाही शहरात पाण्याची तीव्र टंचाई होते, हे संपूर्ण शहराने अनुभवले आहे. पुरेसा पाणीसाठा असतानाही विविध भागात पाण्याची कमतरता जाणवते. त्यातून पालिकेवर सातत्याने मोर्चे येतात. उन्हाळा तीव्र असताना गेल्या काही दिवसांपासून शहरात पाण्याची टंचाई आहे. त्यात दीड दिवस पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे.