पुणे : शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज बोगदा मार्ग (ट्वीन टनेल) करण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी जागतिक पातळीवर निविदा प्रक्रिया मागविण्यात आली आहे.
‘शहरातील वाहतूक सुधारावी, यासाठी येरवडा ते कात्रज हा भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग ‘ट्वीन टनेल’ पद्धतीचा असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा आणि त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा,’ असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएमआरडीएचा अर्थसंकल्प मंजूर करताना फेब्रुवारी महिन्यात दिले होते.
शहरात पूर्व ते पश्चिम जोडणारे अनेक रस्ते आहेत. मात्र, उत्तर ते दक्षिण जोडणारे मार्ग कमी आहेत. त्यामुळे ‘पीएमआरडीए’ने येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार पीएमआरडीए प्रशासनाने त्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे.
येरवडा आणि कात्रज या दरम्यानचे अंतर १४.५ किलोमीटर एवढे आहे. या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. या नियोजित प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावा पीएमआरडीए प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
प्रकल्पाचे तांत्रिक आणि आर्थिक मूल्यांकन
व्यवहार्यता अभ्यासामध्ये या प्रकल्पाचे तांत्रिक आणि आर्थिक मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रकल्पाचा तपशीलवार व्यवहार्यता अहवाल (डीएफआर) तयार करण्यात येणार आहे. तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सार्वजिक खासगी भागीदारी (पीपीपी) सह अन्य प्रारूप पर्यायांचा शोध घेतला जाणार आहे. त्यामध्ये ‘बांधा-वापरा आणि हस्तांतरण करा’ (बीओटी) आणि हायब्रिड ॲम्युनिटी माॅडेल (एचएएम) सारख्या पर्यायांचाही विचार करण्यात येण्याची शक्यता आहे.
येरवडा ते कात्रज बोगदा करण्याच्या दृष्टीने जागतिक पातळीवर सल्लागार नियुक्तीचे प्रस्ताव निविदेच्या माध्यमातून मागविण्यात आले आहेत. तीन महिन्यांत व्यवहार्यता तपासणी होणे अपेक्षित आहे. – प्रभाकर वसईकर, अधीक्षक अभियंता, पीएमआरडीए