सगळा भवताल लेखनातून प्रकट करण्याचे सामथ्र्य असलेल्या ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितांचा पट ‘मृद्गंधा’ कार्यक्रमातून उलगडला.
आकाशवाणी पुणे केंद्राचा हीरकमहोत्सव आणि इंदिरा संत यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी या कार्यक्रमाचे संहितालेखन आणि दिग्दर्शन केले होते. त्यांच्यासह डॉ. वीणा देव, संदीप खरे, गौरी लागू यांनी कवितांचे वाचन केले. ‘नको नको रे पावसा’, ‘वाट पाहते तुझी अशी मी’, ‘किती युगांची भेट’, ‘निर्मल निर्भर वातावरणी’, ‘पुस्तकातली खूण कराया’ या कवितांचे अनुराधा मराठे, विभावरी जोशी आणि अर्चना खासनीस यांनी गायन केले. ज्योती सुभाष आणि शुभांगी दामले यांनी ललित लेखांचे वाचन केले. मौज प्रकाशनचे श्रीनिवास विनायक कुलकर्णी, ‘लोकमत’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर आणि गजलकार हिमांशू कुलकर्णी यांनी इंदिरा संत यांच्या आठवणी सांगितल्या.
अरुणा ढेरे म्हणाल्या, स्त्रीचा आधुनिक कवितेचा प्रवास इंदिरा संत यांच्या कवितेपासून सुरू झाला. भावकवितेचे सौंदर्य, भावविश्व, कमालीची संयत उत्कटता, तरल संवेदना आणि सहज तरीही अर्थवाही कविता ही त्यांच्या कवितेची वैशिष्टय़े आहेत.