पुणे : अष्टविनायक गणपती मंदिर जीर्णोद्धार आणि विकास आराखड्यास सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य शासनाने दिली आहे. त्या संदर्भातील निर्णय राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नियोजन विभागाने १४७ कोटी ८१ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. अष्टविनायक विकास आराखड्यामुळे अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार, तसेच परिसराचा विकास होणार असून, देवस्थानांना भेट देणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना पायाभूत, नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
अष्टविनायक मंदिरे जीर्णोद्धार आणि विकास आराखड्यास गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आग्रही भूमिका घेतली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे या संबंधीच्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली होती. मंत्रिमंडळाच्या मान्यनेनंतर दोन आठवड्यांमध्ये १४७ कोटी ८१ लाख रुपयांचा सुधारित खर्चाच्या निर्णयासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दर्जाची महत्त्वाची स्थळे, तीर्थक्षेत्रे परिसर विकास आराखडे यांची व्याप्ती आणि स्वरूप लक्षात घेऊन आराखडे नियोजन विभागामार्फत राबविण्यात येतात.सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार जिल्ह्यातील मोरगावच्या श्री मयूरेश्वर मंदिरासाठी ८ कोटी २१ लाख, थेऊरच्या श्री चिंतामणी मंदिरासाठी ७ कोटी ८४ लाख, रांजणगावच्या श्री महागणपती मंदिरासाठी १२ कोटी १४ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे.
रायगड जिल्ह्यातील महडच्या श्रीवरदविनायक मंदिरासाठी २८ कोटी २४ लाख, पालीच्या श्रीबल्लाळेश्वर मंदिरासाठी २६ कोटी ९० लाख रुपये प्राप्त होणार आहेत. अहिल्यानगरच्या श्रीसिद्धटेक मंदिरासाठी ९ कोटी ९७ लाख रुपयांच्या खर्चास सुधारीत मान्यता देण्यात आली आहे. यासाठी एकूण शंभर कोटी ५३ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून विद्युतीकरण, रोषणाई, वास्तुविशारद, जीएसटी आदी खर्चासाठी ४७ कोटी ३९ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.