पुणे : ‘गायन शिकल्यामुळे मला लय आत्मसात करता आली. संगीतामध्ये लय महत्त्वाची असते,’ असे मत ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी मंगळवारी व्यक्त केले. ‘बेसुरा खपून जातो. पण, बेताल लगेच ओळखता येतो,’ असे पूर्वीचे कलाकार जे म्हणत त्यामध्ये तथ्य आहे, याची प्रचिती येते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘पुलोत्सव’मध्ये विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते उस्ताद अमजद अली खाँ यांना पुलोत्सव जीवनगौरव प्रदान करण्यात आला, यानिमित्ताने मकरंद ब्रह्मे यांनी अमजद अली खाँ यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार आणि बेलवलकर हाऊसिंगचे समीर बेलवलकर या वेळी उपस्थित होते.
‘शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य करतो असे काही संस्था गौरवाने सांगतात. पण, संगीत मैफली विनामूल्य असू नयेत. कला आणि संगीताचा आदर करण्यासाठी मूल्य आकारले गेले पाहिजे. मंदिरात, दर्ग्यात आपण दक्षिणा देतो. मग संगीताच्या प्रेमापोटी काही मूल्य द्यायला काय हरकत आहे?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘प्रत्येक क्षेत्रात निवृत्तीचे वय ठरलेले असते. प्रत्येक वेळी कलाकार ठरवून नाही तर, आपोआप थांबतो,’ याकडे लक्ष वेधून अमजद अली खाँ म्हणाले, घरामध्ये संगीत असलेल्या कुटुंबातील मुले आपली जबाबदारी समजू शकले, तर घराणे पुढे जाते. वयाच्या बाराव्या वर्षापासून मी वादन करतोय. १९६३ मध्ये अमेरिकेची यात्रा केली आणि त्यानंतर कधी शाळेत गेलोच नाही. पण, अयान आणि अमान हे दोघेही पदवीधर आहेत.’
अभ्यंकर म्हणाले, ‘लेखणी आणि वाणीद्वारे पुलंनी खूप हसविले आणि दातृत्वातून भरभरून देत लोकांची मने जिंकली. संगीत ही वैश्विक भाषा आहे. जगात सर्वत्र अमजद अली खाँ यांचे सरोदवादन झाले आहे. तालीम, अदब आणि रियाज याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत.’राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.
माझ्या वाद्याला मुंबईचे दमट हवामान मानवणारे नव्हते. चित्रपटासाठी वादन करणे माझी मनीषा नव्हती. शास्त्रीय संगीताने आणि रसिकांनी माझ्यावर इतके प्रेम केले की चित्रपटाच्या मोहमयी दुनियेत रमावे असे वाटलेच नाही.उस्ताद अमजद अली खाँ, ज्येष्ठ सरोदवादक