पुणे : सदाशिव पेठेतील भावे स्कूलसमोरील गल्लीत भरधाव मोटारीने बारा जणांना धडक दिल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. याप्रकरणी मोटारचालकासह तिघांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले. चालक आणि सहप्रवाशांनी मद्यप्राशन केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याप्रकरणी मोटारचालक जयराम शिवाजी मुळे (वय २७, रा. बिबवेवाडी), सहप्रवासी राहुल गोसावी (वय २७), दिगंबर शिंदे (वय २७) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

किशोर हरिभाऊ भापकर (वय ५७), पायल आदेशकुमार दुर्गे (वय २६), गुलनाज सिराज अहमद (वय २३), सोनाली सुधाकर घोळवे (वय ३०), मंगेश आत्माराम सुरुसे (वय ३३), अमित अशोक गांधी (वय ४५), समीर श्रीपाद भालकीकर (वय ४५), सोमनाथ केशवर मेरुकर (वय २८), प्रशांत ब्रह्मदेव बंडगर (वय ३०), अविनाश फाळके, प्रथमेश पलंगे, संदीप खोपडे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील भावे प्रशालेसमोरून छत्रपती राजाराम मंडळाकडे जाणाऱ्या गल्लीत वैष्णवी टी सेंटर आहे. हा रस्ता अरुंद आहे. भरधाव मोटारीने शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास टी सेंटरसमोर चहा प्यायला थांबलेल्या बारा जणांना धडक दिली. अपघातात दोन ते तीन जणांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच या भागातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. नागरिकांनी मोटारचालक मुळे, गोसावी, शिंदे यांना पकडले. त्यांना चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

अपघातात चौघांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर आमदार हेमंत रासने यांनी घटनास्थळी भेट दिली.

आरोपी मोटारचालकासह साथीदारांनी मद्यप्राशन केल्याचा संशय आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून, त्यांनी मद्यप्राशन केले किंवा नाही, याबाबतची माहिती तपासणीत मिळेल. – निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातातील जखमींमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे काही विद्यार्थी आहेत. त्यांची एक परीक्षा रविवारी (१ जून) होणार आहे. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला आहे. विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे, तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येईल. – हेमंत रासने, आमदार, कसबा विधानसभा मतदारसंघ