पुणे : ‘दिल्लीकेंद्रित असलेल्या मुद्रित, इलेक्ट्राॅनिक, तसेच डिजिटल माध्यमांमुळे प्रादेशिक स्तरावरील महत्त्वाचे विषय राष्ट्रीय स्तरावर दुर्लक्षित होतात. परिणामी प्रादेशिक मुद्दे राष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकत नाहीत,’ असे मत ज्येष्ठ माध्यमकर्मी धन्या राजेंद्रन यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

फ्रेंड्स ऑफ व्यंकटेश आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ‘भारतीय माध्यमांतला समकालीन दुभंग’ या विषयावर धन्या राजेंद्रन यांनी व्यंकटेश चपळगांवकर स्मृती व्याख्यान पुष्प गुंफले. त्या वेळी त्या बोलत होत्या. पुणे पत्रकार प्रतिष्ठानाचे अध्यक्ष शैलेश काळे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव आणि ज्येष्ठ पत्रकार प्रतिभा चंद्रन या वेळी उपस्थित होत्या.

‘प्रदेशनिष्ठता, विचारधारा, मालकी, डिजिटल माध्यमे आणि जातीयता, असे पाच दुभंग माध्यमांमध्ये दिसून येतात’, याकडे लक्ष वेधून धन्या राजेंद्रन म्हणाल्या, ‘माध्यमांमध्ये मुद्रित, वृत्तवाहिन्या व डिजिटल असे दुभंगलेपण असल्याने माध्यमांसंबंधी असलेल्या महत्त्वाच्या धोरणात्मक निश्चितीसारख्या प्रसंगीही सर्व प्रकारची माध्यमे एकत्रितपणे शासनासमोर येताना दिसत नाहीत. विचारधारेतील भिन्नतेमुळेही माध्यमे एकमेकांपासून अंतर राखतात. माध्यमांची मालकी राजकीय नेत्यांकडे किंवा मोठ्या उद्योगपतींकडे असल्याने, त्यांचे वैयक्तिक प्रभाव माध्यमांच्या वार्तांकनावर परिणाम करतात आणि निखळ पत्रकारिता बाजूला पडते. डिजिटल माध्यमांकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले जाते का, हा कळीचा मुद्दा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘राज्य पातळीवरील महत्त्वाची बातमी आपण घ्यायला हवी, हे दिल्लीतील माझ्या वरिष्ठांना सांगताना माझी दमछाक होत असे. राष्ट्रीय माध्यमांचा हा दुजाभाव अनुभवल्यानंतर मी स्वतःच्या डिजिटल माध्यमाकडे वळले,’ असे त्यांनी सांगितले.मयूरेश कोण्णूर यांनी सूत्रसंचालन केले. गुरव यांनी आभार मानले.