पुणे : मोसमी वाऱ्यांनी अत्यंत वेगाने वाटचाल करून मुंबई-पुण्याचा पल्ला गाठला खरा, मात्र यंदा मोसमी वाऱ्यांनी केलेली ही वाटचाल दुर्मीळ असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे असून, ही अल्पावधीतील वाटचाल शास्त्रज्ञांनाही अचंबित करणारी ठरली आहे.

मोसमी वारे, पावसाबाबतच्या अभ्यासातून गेल्या काही वर्षांमध्ये काही ठोकताळे तयार झाले. त्यानुसार, मोसमी वारे केरळमध्ये १ जूनला दाखल होतात, ८ जुलैपर्यंत देश व्यापतात, १७ सप्टेंबरच्या सुमारास मोसमी वाऱ्यांचा माघारी जाण्याचा काळ सुरू होऊन १५ ऑक्टोबरच्या सुमारास मोसमी वारे देशातून बाहेर जातात. दर वर्षी या वेळापत्रकात काही दिवस पुढे-मागे होतात. यंदा मात्र मोसमी वाऱ्यांनी अचंबित करणारी वाटचाल केली आहे. केरळमध्ये २४ मे रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांनी अवघ्या एका दिवसात महाराष्ट्रात प्रवेश केला, तर दोन दिवसांत महाराष्ट्राचा काही भाग व्यापला.

‘ही घटना अतिशय दुर्मीळ आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटक-गोवा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन ते क्षेत्र उत्तरेकडे सरकले. त्यानंतर ते पूर्वेकडे सरकून भूपृष्ठावर आले. सध्या ही प्रणाली मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यावर सक्रिय आहे. त्यामुळे इतक्या जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. ही प्रणाली समुद्रातून पश्चिमेकडे दूर गेली असती, तर पावसाला विलंब झाला असता. मोसमी वाऱ्यांनी यंदा अत्यंत कमी वेळात केलेली वाटचाल अचंबित करणारी आहे,’ असे भारतीय हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितले.


भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत पाऊस येण्याचे निकष बदलले आहेत. तसेच पावसाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. पूर्वी उपग्रह नसताना अंदाज वर्तवण्याचे स्वरूप मर्यादित होते. आता उपग्रहांमुळे अंदाज वर्तवण्याची क्षमता वाढली आहे. गेली आठ वर्षे पाऊस सर्वसाधारण होता. त्यामुळे यंदा आलेला पाऊस लवकर वाटतो आहे. पाऊस लवकर आला म्हणजे फार काही वेगळे घडले असे नाही. या पूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केरळमध्ये मोसमी वारे दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात येण्यासाठी आठ-दहा दिवस लागतात, हे आपण माणसांनी ठरवले आहे. मात्र, निसर्गाची अनेक रहस्ये अजून उलगडलेली नाहीत. निसर्ग माणसांच्या नियमांनी चालत नाही. म्हणूनच दर वर्षी वेगळी करामत दिसून येते. त्या प्रमाणेच पाऊस लवकरही येऊ शकतो, हे निसर्गाने दाखवून दिले. अंदाज वर्तवण्यात आव्हाने आहेत आणि ती असलीच पाहिजेत, शास्त्रज्ञ अचंबित झाले पाहिजेत. त्यातूनच नवे काही शिकता येईल, नवे काही तरी घडेल- डॉ. रंजन केळकर, माजी महासंचालक, आयएमडी