पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधून (एनडीए) महिला छात्रांची पहिली तुकडी उत्तीर्ण होणे हा सैन्याची सर्वसमावेशकता आणि सक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. या युवती नारीशक्तीचे प्रतीक आहेत. ही शक्ती केवळ महिला विकासासाठी नाही, तर महिलांच्या नेतृत्वाखालील विकासासाठीही महत्त्वाची आहे, असे मत मिझोरामचे राज्यपाल आणि माजी लष्करप्रमुख जनरल (नि.) व्ही. के. सिंग यांनी शुक्रवारी मांडले. तसेच भविष्यात या छात्रांपैकी कोणी तरी त्यांच्या सेवेतील सर्वोच्च पदी पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘एनडीए’च्या १४८ व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन खेत्रपाल मैदानावर शुक्रवारी मोठ्या दिमाखात झाले. त्या वेळी सिंग बोलत होते. सिंग यांनी मानवंदना स्वीकारून संचलनाचे निरीक्षण केले. संचलनात एकूण १ हजार ३४१ छात्रांनी सहभाग घेतला. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ प्रमुख एअर मार्शल आशुतोष दीक्षित, ‘एनडीए’चे प्रमुख व्हाइस ॲडमिरल गुरुचरण सिंग, उपप्रमुख एअर मार्शल सरताजसिंग बेदी या वेळी उपस्थित होते. १४८ व्या तुकडीतील पहिल्या महिलांच्या तुकडीतील १७ छात्रांसह ३३६ छात्रांनी अंतिम पग ओलांडून देशसेवेसाठीचे पहिले पाऊल टाकले. त्यामुळे सैन्याच्या आणि एनडीएच्या इतिहासातील हे दीक्षान्त संचलन ऐतिहासिक ठरले. संचलनादरम्यान चेतक हेलिकॉप्टर, सुपर डिमोना ग्लायडर, लढाऊ विमान सुखोई ३० यांनी सलामी दिली.

‘एनडीए’चेच माजी छात्र असलेले सिंग म्हणाले, ‘जग वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञान, सायबर युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश संरक्षण युद्धभूमीला आकार देत आहेत. उद्याचे योद्धे बौद्धिकदृष्ट्या चपळ आणि शारीरिकदृष्ट्याही कणखर असले पाहिजेत. त्यामुळे शिकणे थांबवून चालणार नाही. प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेत नावीन्यपूर्ण विचार करून नेतृत्व केले पाहिजे. देशाचे सशस्त्र दल केवळ लष्करी शक्तीसाठी नाही, तर ते सन्मान, कर्तव्य, त्यागासाठी ओळखले जाते. सैन्याची ताकद केवळ शस्त्रांमध्ये नाही, तर विश्वासामध्ये असते. हा विश्वास व्यावसायिक उत्कृष्टतेतून निर्माण होतो. ज्ञान वाढवत विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय करून घेत युद्धात नेतृत्व करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्राप्त केली पाहिजेत. तीनही सेवांमध्ये अखंड एकात्मता आणि संयुक्तता महत्त्वाची आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रिन्स राज सुवर्णपदकाचा मानकरी

याच कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या छात्रांना गौरवण्यात आले. त्यात प्रिन्स राज या छात्राला राष्ट्रपती सुवर्णपदक, उदयवीरसिंग नेगी या छात्राला रौप्यपदक, तेजस भट या छात्राला कांस्यपदक, तसेच गोल्फ स्क्वाड्रनला चीफ ऑफ स्टाफ बॅनर प्रदान करण्यात आले. सुवर्णपदक विजेता प्रिन्स राज हा मूळचा बिहारमधील भोजपूरचा आहे. त्याचे वडील रेल्वेत कार्यरत आहेत, तर आई गृहिणी आहे. त्याचे शिक्षण सैनिकी शाळेतून झाले आहे. ‘तीन वर्षांचे प्रशिक्षण खडतर होते. एनडीएमध्ये येताना असलेली भावना वेगळी होती. मात्र, आता आयुष्य बदलून बाहेर पडत आहे,’ अशी भावना प्रिन्स राजने व्यक्त केली.