पुणे : कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रापर्यंत आल्याने पुढील तीन ते चार दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पावसाचे सावट कायम राहणार आहे. दक्षिण कोकणात काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात काही भागात जोरदार पावसाने हजेरीही लावली आहे. कमी दाबाचे क्षेत्र पुढील ४८ तासांमध्ये पूर्व-मध्य अरबी समुद्रात होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील तीन ते चार दिवस पावसाळी स्थिती कायम राहणार आहे. दक्षिण कोकणात ४ आणि ५ नोव्हेंबरला काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरीर, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत काही भागात जोरदार पाऊस तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत याच कालावधीत काही भागात पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भामध्ये मात्र हवामान कोरडे राहणार आहे. कारण काय? श्रीलंकेच्या किनारपट्टीवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत सध्या दक्षिण अरबी समुद्रात आले आहे. या क्षेत्रामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.