मुरलीधर मोहोळ यांना एकच सांगू इच्छितो की, त्यांच्याकडे पहिलवान जरी असले तरी आमच्याकडे वस्ताद आहेत, अशा शब्दात रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांना टोला लगावला. महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेची उमेदवारी आमदार रवींद्र धंगेकर यांना जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवाजीनगर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. धंगेकर यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारीदेखील उपस्थित होते. शरद पवार आणि धंगेकर यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्या चर्चेनंतर धंगेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भूमिकामांडली.

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी निवडणुकीच्या प्रचारार्थ शहरातील पहिलवानांची बैठक घेतली. त्यामुळे आगामी निवडणुकीत तुम्हाला पहिलवानांचा सामना करावा लागणार का, या प्रश्नावर धंगेकरी म्हणाले की, हे जय बजरंगबलीच क्षेत्र आहे. तसेच पहिलवान हे सर्वसामान्य कुटुंबातील आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी असतात.पूर्वी प्रत्येक घरात एक पहिलवान असायचा, तो गावाचा आणि कुटुंबाचे रक्षण करायचा, त्यामुळे पहिलवान हा सर्वांचा असतो. तो कोणत्याही पक्षाला बांधिल नसतो. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांनी किती पहिलवानांना अर्धा लिटर दूध पाजले, याबाबतचा हिशेब त्यांनी दिला पाहिजे. त्यांनी व्यास, गोखले आणि बिल्डर लोकांना दूध पाजले. त्यांनी कधीही आमच्या गरीब पहिलवान लोकांना अर्धा लिटर दूध पाजले नाही. त्यामुळे त्यांनी पहिलवान जरी आणले असले, तरी ते कोणत्याही पक्षाचे बांधिल नसतात. तर सर्व समाजाचे असतात. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना एकच सांगू इच्छितो की, त्यांच्याकडे पहिलवान जरी असले तरी आमच्याकडे वस्ताद आहेत, अशा शब्दात त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना टोला लगावला.

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

तुम्ही आज शरद पवार यांची भेट घेतली त्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली. त्याबाबत धंगेकर म्हणाले की, देशाच्या उभारणीमध्ये शरद पवार यांचे मोठ योगदान असून त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले आहे. तर आता लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून, मला पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडून आगामी काळात निवडणुकीकरीता मार्गदर्शन घेतले. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली असून त्यांच्या मार्गदर्शनाचा निवडणुकीत नक्किच फायदा होईल. तसेच पुणे लोकसभेत येणार्‍या काळात सहा विधानसभा मतदारसंघांत होणार्‍या सभांमध्ये शरद पवार हे उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शनदेखील करणार.

हेही वाचा – मीरा भाईंदरमधील भाजप-शिवसेना वाद शिगेला

हेही वाचा – मावळमध्ये महायुतीतील तिढा वाढला

आबा बागूल यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी नाराजी बोलवून दाखवली आहे. त्यांचा फटका निवडणुकीत बसू शकतो का? त्यावर, आबा बागूल हे आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांचे काम मोठ आहे. कोणालाही उमेदवारी मिळाली नाही तर राग येण, आपल्या भावना व्यक्त करणे स्वाभाविक आहे. त्याप्रमाणे आबा बागुल यांनी केले आहे.आबांना राग जरी आला असला तरी ते मायाळू आहेत. मी त्यांची भेट घेऊन समजूत काढणार आहे. ते माझे नक्कीच ऐकतील, असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला.