बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या आंध्र प्रदेशातील श्रीशैल (मल्लिकार्जुन मंदिर) येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ साली एक महाल व ध्यान मंदिर बांधले होते. त्या ध्यान मंदिरांची सध्या प्रचंड प्रमाणात पडझड होऊन ते नष्ट झाले असून त्याच्या पुनर्निर्माणाचे काम श्री शिवाजी मेमोरिअल कमिटीने हाती घेतले आहे.
कमिटीचे उदय खर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कामासाठी स्थानिक पातळीवर इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, प्रा. क्षितिज पाटुकले, नामदेवराव जाधव त्याचे सदस्य आहेत. शिवाजी महाराजांनी श्रीशैल येथील वातावरणाने प्रभावित होत सहा महिने तेथे वास्तव्य केले होते. तसेच तेथील स्थानिक आदिवासींना एकत्र करून त्यांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जोडून घेतले होते. महाराजांनी श्री मल्लिकार्जुन मंदिरात अनेक प्रकारच्या दुरुस्त्या, बांधकामे केली. त्यामुळे दक्षिण दिशेच्या महाद्वाराला ‘शिवाजी द्वार’ या नावाने ओळखले जाते. ध्यान मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी सुमारे दोन लाखांचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी शिवभक्तांनी आर्थिक मदतीसाठी ०२०- २५५३४६०१, ९३७११०२४३९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.