पुणे : आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात किमतीवरील नियंत्रणासाठी खाद्यतेल आणि तेलबियांचा साठा करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सहसचिव चारुशीला आंबेकर यांनी प्रसृत केले आहेत. त्यानुसार राज्यात ३० जूनपर्यंत हे निर्बंध राहणार असून खाद्यतेल आणि तेलबियांचा सध्या करण्यात आलेला साठाही शासनाकडून घालण्यात आलेल्या मर्यादेप्रमाणात ठेवावा, अन्यथा संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली असल्याने केंद्र सरकारने ३ फेब्रुवारी रोजी अधिसूचना प्रसृत करून खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठवणुकीवर ३० जूनपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार खाद्यतेल किरकोळ बाजारातील विक्रेत्यांना ३० क्विंटलची, घाऊकसाठी विक्री करणाऱ्यांना ५०० क्विंटलची मर्यदा आहे, तर मोठय़ा ग्राहक असलेल्या किरकोळ विक्रेत्यांसाठी ३० क्विंटल आणि आगारात एक हजार क्विंटल एवढी मर्यादा घालण्यात आली आहे. तसेच तेलबियांसाठी किरकोळ बाजारातील विक्रेत्यांना १०० क्विंटल, तर घाऊकसाठी विक्री करणाऱ्यांना दोन हजार क्विंटल मर्यादा असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ज्या रिफायनरी, मिलर, एक्स्ट्रक्टर, घाऊक किंवा किरकोळ व्यापारी, विक्रेत्यांकडे विदेश व्यापार महानिदेशालय यांच्याकडून आयात-निर्यातीबाबतचा सांकेतिक क्रमांक आहे, या घटकांकडील साठा निर्बंधांच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास संबंधितांनी   https://evegoils.nic.in या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करायचा आहे. तसेच संबंधितांनी त्यांच्याकडील साठा ३० दिवसांत घालून दिलेल्या मर्यादेत ठेवावा. केंद्र आणि राज्य शासनाच्या खाद्यतेल, तेलबियांच्या साठवणुकीबाबतच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.