पिंपरी : आषाढी पायीवारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी आळंदी येथील मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. प्रथा, परंपरेनुसार रात्री आठच्या सुमारास माऊलींच्या पालखीचे समाधी मंदिरातून प्रस्थान होईल. १७ दिवसांचा प्रवास करुन ५ जुलैला पालखी सोहळा पंढरीत पोहचणार आहे. याबाबतची माहिती माऊलींचे पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी दिली.

माऊलींच्या पालखीचा दर्शनबारी मंडपात (गांधीवाडा, आजोळी) पहिला मुक्काम असणार आहे. २० जून रोजी पालखी पुण्यात दाखल होईल. २० आणि २१ जून रोजी पालखी सोहळा पुण्यनगरीत मुक्कामी राहील. २२, २३ जूनला सासवड, २४ जूनला जेजुरी, २५ जूनला वाल्हेत पालखी मुक्कामी असेल. त्यानंतर नीरा स्नाननंतर २६ जूनला पालखी सोहळा लोणंद येथे मुक्कामी जाईल. यंदा लोणंदला एकच दिवस पालखी मुक्कामी असेल. त्यांनतर २७ जूनला चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होईल. पालखी तरडगाव येथे मुक्कामी असणार आहे. २८ जूनला फलटण, २९ जूनला बरड, ३० जूनला नातेपुते, १ जुलैला पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होईल. त्यानंतर पालखी माळशिरसला मुक्कामी जाईल. २ जुलैला सकाळचा विसावा असलेल्या खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होईल. पालखी वेळापूर मुक्कामी जाईल. ३ जुलैला भंडीशेगाव, ४ जुलैला बाजीरावची विहीर येथे उभे आणि गोल रिंगण होईल. पालखी वाखरीत मुक्कामी असेल. तर, ५ जुलैला पालखी सोहळा पंढरीत पोहचणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंढरीत आषाढी एकादशीचा सोहळा ६ जुलैला संपन्न होईल. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब येथे पाहिले उभे रिंगण, पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण, खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण, ठाकुरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण, वाखरीच्या बाजीराव विहीर येथे दुसरे उभे व चौथे गोल रिंगण, इसबावी पादुकांजवळ पंढरपूर प्रवेशापूर्वी तिसरे उभे रिंगण होईल. पाच दिवस पालखी पंढरीत मुक्कामी असणार आहे. त्यानंतर १० जुलैला पालखी परतीचा प्रवास सुरू करेल. ११ दिवसांचा पायी प्रवास करून पालखी सोहळा पुन्हा २० जुलैला आळंदीत दाखल होणार आहे.